Tukaram Mundhe FDA Praise : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कामगिरीचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. मुंढे यांच्या कडक कार्यपद्धतीमुळे हा विभाग पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला असून, त्यांची पुढील ३ वर्षे या पदावरून अजिबात बदली करू नये, अशी आग्रही मागणी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्वपक्षीय नेत्यांनी लावून धरली होती.
आमदारांच्या या जोरदार मागणीची दखल घेत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले.
आजवर या विभागाला अनेक आयुक्त लाभले, परंतु मुंढे यांनी जे काम करून दाखवले ते यापूर्वी कोणीच केले नाही, अशा शब्दांत आमदारांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, भेसळखोर आणि गुटखा माफियांच्या विरोधात सुरू केलेल्या कडक मोहीमेमुळे तुकाराम मुंढे यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर मुद्दाही यावेळी सभागृहात उपस्थित करण्यात आला.
नेत्यांनी व्यक्त केला उद्वेग; विरोधक असूनही निधीसाठी पाठपुरावा करण्याची तयारी
सभागृहात विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेबाबत आणि कामाबाबत चिंता व्यक्त केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मुंढे यांच्या कडक कारवाईमुळे त्यांचे शत्रू वाढले असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांना तात्काळ कडक संरक्षण दिले पाहिजे आणि त्यांची ३ वर्षे बदली करू नये. तसेच, संत तुकाराम आणि संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील गुरुबंधू आणि वंदनीय सहयात्री होते, त्याच धर्तीवर आता आयुक्त तुकाराम आणि मंत्री नरहरी यांनी एकत्र येऊन सहयात्री व्हावे आणि राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळ समूळ नष्ट करावी, अशी अनोखी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दुसरीकडे, विरोधी बाकांवर असूनही आम्ही या विभागाला मंजूर झालेला सर्व निधी मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली. राज्यातील अनेक भागांतील गुटखा विक्री मुंढेंच्या धाडसामुळे पूर्णपणे बंद झाली असून लहान मुलांना होणारा कर्करोगाचा धोका टळत आहे, त्यामुळे जे काम मुंढेंनी केले, ते आधीच्या अधिकाऱ्यांना का जमले नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी अर्जुन खोतकर यांनी केली.
पुन्हा पुन्हा चूक करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द होणार
सभागृहात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी एका महत्त्वाच्या त्रुटीकडे लक्ष वेधले होते की, एफडीए ज्या ठिकाणी कारवाई करते, तिथे काही दिवसांनी पुन्हा भेसळ सुरू होते. त्यावर ठोस उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, आयुक्त मुंढे आणि विभाग अत्यंत समन्वयाने काम करत असून, आता जे भेसळखोर पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करताना सापडतील, त्यांचे व्यावसायिक परवाने कायमस्वरूपी रद्द केले जातील.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा










