Lohagad Death Case : लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा (Ketan Agrawal Pune Lohagad Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या गुन्ह्यातील धक्कादायक आणि क्रूर कृत्ये समोर येत आहेत. मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांनी केतनचा काटा काढण्यासाठी केवळ लोहगडावरून ढकलण्याचाच विचार केला नव्हता, तर त्यापूर्वी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे अनेक भयंकर कट रचले होते, अशी नवीन आणि थरारक माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून हाती आली आहे.
‘स्लो पॉयझन’ देण्याचा डाव फसला; कायमचे अपंग करण्याचा होता क्रूर हेतू
पोलीस चौकशीत उघड झालेल्या नव्या माहितीनुसार, केतन अग्रवालला थेट मारण्यापूर्वी त्याला ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू शरीरात भिनणारे विष) देण्याचा कट सिया आणि चेतनने आखला होता. त्याला अन्नातून किंवा पेयातून हे विष देऊन शारीरिकदृष्ट्या कायमचे अपंग (Permanently Disabled) करायचे, असा या दोघांचा डाव होता. जेणेकरून तो कोणत्याही प्रकारे त्यांच्या मार्गात येणार नाही. मात्र, या क्रूर कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना बाजारातून किंवा इतर स्रोतांकडून आवश्यक ते घातक विष वेळेत मिळू शकले नाही. विष मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे त्यांचा हा पहिला भयंकर डाव ऐनवेळी फसला आणि त्यानंतर त्यांनी त्याची प्रत्यक्ष हत्या करण्याचा अंतिम कट रचल्याचे बोलले जात आहे.
माघार घेणारा ‘तो’ कॉन्ट्रॅक्ट किलर होणार प्रमुख सरकारी साक्षीदार
केतनची हत्या करण्यासाठी या जोडप्याने रचलेल्या पूर्वतयारीचे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांनी सुरुवातीला स्वतः गुन्ह्यात न अडकता एका व्यावसायिक मारेकऱ्याला (Contract Killer) सुपारी देण्याचे ठरवले होते. या संदर्भात पुणे येथील एका कॅफेमध्ये सिया आणि चेतनची त्या मारेकऱ्यासोबत गुप्त बैठक (Meeting) झाली होती. या बैठकीत त्यांनी केतन अग्रवाल याच्यावर पाळत ठेवण्याची आणि त्याची सर्व माहिती मारेकऱ्याला दिली.
परंतु, केतन अग्रवाल कोण आहे, त्याची पार्श्वभूमी आणि कुटुंबाविषयी समजताच तो कॉन्ट्रॅक्ट किलर प्रचंड घाबरला आणि त्याने या गुन्ह्यात सामील होण्यास स्पष्ट नकार देत ऐनवेळी माघार घेतली. पुणे पोलिसांनी त्या कॅफेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज कायदेशीररित्या जप्त केले आहे. आता ऐनवेळी नकार देणाऱ्या याच संभाव्य मारेकऱ्याला या संपूर्ण खटल्यात सिया आणि चेतनविरोधात न्यायालयात मुख्य सरकारी साक्षीदार (Star Witness) बनवण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पाहिला २ तासांचा जपानी व्हिडिओ
पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यानंतर कायद्यापासून कसे वाचायचे, याचेही नियोजन या दोघांनी आधीच केले होते. अटकेनंतर किंवा चौकशीदरम्यान पोलिसांसमोर पूर्णपणे शांत कसे राहायचे, चेहऱ्यावर भीतीचे भाव न आणता कठीण आणि चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशा चलाखीने द्यायची, याचे विशेष प्रशिक्षण देणारा तब्बल दोन तासांचा एक जपानी व्हिडिओ सिया आणि चेतनने इंटरनेटवर पाहिला होता. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल फोन सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता, त्यांच्या इंटरनेट वेब हिस्ट्रीमधून (Web History) या गुन्हेगारी प्रशिक्षणाच्या व्हिडिओच्या लिंक्स जप्त करण्यात आल्या आहेत, जो पोलिसांसाठी एक भक्कम तांत्रिक पुरावा ठरला आहे.
“मी सून आणायला निघालो होतो, पण माझा २६ वर्षांचा एकुलता एक मुलगाच हिरावला!”; केतन अग्रवालच्या वडिलांचा पत्रकार परिषदेत टाहो, पंतप्रधानांना साकडे-
या कायदेशीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आज केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी एक अत्यंत भावनिक पत्रकार परिषद घेतली. आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाच्या आठवणीने आणि त्याच्यावर झालेल्या क्रूर अन्यायावर बोलताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण वातावरण हेलावून गेले होते.
“दुःख समुद्रापेक्षा मोठे; म्हातारपणाचा एकमेव आधार तुटला”
पत्रकार परिषदेत आपली तीव्र व्यथा मांडताना केतनचे वडील म्हणाले, “हे दुःख आमच्या कुटुंबासाठी समुद्रापेक्षाही विशाल आहे. मी तर माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न करून घरात सून आणण्याच्या तयारीत होतो. मात्र, नियतीने आमच्यावर असा घाला घातला की मुलाचे लग्न तर दूरच, पण आज माझा २६ वर्षांचा जवान मुलगाही जगात राहिला नाही आणि या धक्क्याने माझे वडीलही आम्हाला सोडून गेले. प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात एकच स्वप्न पाहतो की, म्हातारपणी आपला मुलगा आपल्याला सांभाळेल, आपल्या वृद्धत्वाचा तो लाठी बनेल. मात्र, माझे हे स्वप्न आता पूर्णपणे चिरडले गेले आहे. माझा एकच मुलगा होता आणि तोही क्रूरपणे हिरावून घेतला गेला. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हे दुःख माझ्या मनातून कधीही कमी होऊ शकत नाही.”
लग्न जुळवणारे मित्तल कुटुंबही संशयाच्या भोवऱ्यात; वडिलांचा थेट आरोप
केतनचे लग्न ठरवताना मध्यस्थ कोण होते, या माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, हे लग्न त्यांचे सख्खे चुलत मामा नरेंद्र जगन्नाथ मित्तल आणि मामी रेणू नरेंद्र मित्तल यांनी पुढाकार घेऊन जुळवून दिले होते. लग्न ठरवताना मित्तल दांपत्याने अग्रवाल कुटुंबाला पूर्ण विश्वास दिला होता की, ‘ही मुलगी आमची स्वतःचीच मुलगी आहे असे समजा, आम्ही तिला लहानपणापासून अगदी जवळून पाहिले व मोठे केले आहे. ती अत्यंत संस्कारी, सुविद्य आणि चांगल्या घरची मुलगी आहे.’
केतनच्या वडिलांनी आरोप केला की, “मामा-मामींनी दिलेल्या इतक्या मोठ्या खात्रीवर विश्वास ठेवूनच आम्ही हे लग्न ठरवले होते. मात्र, आता समोर आलेली परिस्थिती पाहता, सियाच्या या आधीच्या कृत्यांची आणि तिच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची माहिती मित्तल कुटुंबाला आधीपासूनच होती का, असा मोठा संशय मला येत आहे. त्यामुळे या संपूर्ण कटात लग्न जुळवून देणारे मित्तल कुटुंबही तितकेच जबाबदार आहे. मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून पोलीस या बाजूनेही सखोल तपास करतील.”
“फोन नेहमी व्यस्त असायचा, आम्ही समजुतीची भूमिका घेतली”
सिया आणि केतन यांच्यात लग्नापूर्वी काही वाद किंवा भांडणे होत होती का, यावर बोलताना त्यांनी भूतकाळातील काही गोष्टींना उजाळा दिला. केतन अनेकदा घरी सांगायचा की, सिया कधी-कधी विनाकारण नाराज होते आणि खूप चिडचिड करते. तसेच तिचा मोबाईल फोन बहुतांश वेळ व्यस्त (Engaged) असायचा. परंतु, नवीन नाते जोडले जात असल्याने सुरुवातीला एकमेकांकडून काही अपेक्षा असतील आणि हळूहळू सर्व काही सुरळीत होईल, असा विचार करून आम्हीच केतनची समजूत काढायचो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सिया आणि चेतन यांच्यात आधीपासूनच प्रेमसंबंध होते किंवा त्यांच्यात लग्नाची बोलणी झाली होती, याबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आले होते. ही सर्व धक्कादायक माहिती आम्हाला केवळ प्रसारमाध्यमांच्या (Media) माध्यमातूनच समजली, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्याय मिळवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
आपल्या निष्पाप मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले आहे. याबद्दल सांगताना ते अत्यंत भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या सुशिक्षित आणि अत्यंत गुणी मुलाची कोणतीही चूक नसताना केवळ काही नराधमांच्या स्वार्थापोटी आणि क्रूरतेमुळे त्याचा बळी गेला. एका बापाने आपली व्यथा थेट देशाच्या प्रधानांकडे मांडली आहे. माझ्या मुलावर झालेला हा अन्याय असह्य आहे. सियाला जर केतनसोबत लग्न करायचे नव्हते, तर तिने एकदा स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला हवे होते. तिने नकार दिला असता तर केतन आज जिवंत असता आणि हा भयानक प्रसंग घडलाच नसता. हे सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते.










