Mumbai Indians : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. दहा सामन्यांपैकी केवळ तीनच विजय मिळवू शकलेला मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. संघाची ही ढासळती स्थिती पाहता, आता कर्णधारपदावरूनही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या आणि तात्पुरती धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव हे दोघेही आगामी सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याने मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
हार्दिक आणि सूर्याच्या अनुपस्थितीचे कारण
हार्दिक पांड्या सध्या दुखापतग्रस्त असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो लखनऊविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने रायपूर दौऱ्यातही संघासोबत प्रवास करू शकलेला नाही. दुसरीकडे, हार्दिकच्या जागी नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव १० मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात उपलब्ध नसेल, अशी माहिती समोर येत आहे. सूर्यकुमार लवकरच पितृत्वाची जबाबदारी स्वीकारणार असल्याने त्याने कौटुंबिक कारणास्तव या सामन्यातून रजा घेतल्याचे समजते.
रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व जाणार का?
हार्दिक आणि सूर्या या दोघांच्या अनुपस्थितीत मुंबईचे संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा अनुभवी रोहित शर्माकडे वळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहितने १६३ सामन्यांत मुंबईचे नेतृत्व करताना पाच वेळा जेतेपद मिळवून दिले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला या कठीण प्रसंगात होऊ शकतो. मात्र, रोहितने २०२३ च्या हंगामात शेवटचे नेतृत्व केले होते, त्यानंतर ही जबाबदारी हार्दिककडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे रोहित पुन्हा एकदा ही धुरा स्वीकारण्यास तयार होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बुमराह आणि तिलक वर्मा: नवे पर्याय-
रोहितव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांची नावे देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.
१. जसप्रीत बुमराह: बुमराह हा संघाचा मुख्य आधारस्तंभ असून त्याने भारतीय राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही भूषवले आहे. आयपीएलमध्ये अद्याप त्याला मुंबईचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही, मात्र परिस्थिती पाहता त्याच्या अनुभवावर संघ विश्वास टाकू शकतो.
२. तिलक वर्मा: जर व्यवस्थापन भविष्याचा विचार करून एखाद्या युवा चेहऱ्याला संधी देण्याच्या मनस्थितीत असेल, तर तिलक वर्माचे नाव आघाडीवर आहे. टिळकाने या हंगामात एक शतक झळकावले असले तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे.
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा-
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला एका ठोस निर्णयावर पोहोचावे लागणार आहे.











