Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी (Life-Line) समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणारे वाद आता केवळ शाब्दिक राहिलेले नसून, त्यांना अत्यंत हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांमधील हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, यामुळे लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आला आहे. मुंबईत नुकतीच घडलेली एका तरुणाची निर्घृण हत्या आणि काल रात्री सीएसएमटी-अंबरनाथ लोकलमध्ये झालेला रक्तरंजित राडा यांमुळे प्रवाशांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या तुफान हाणामारीचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याने मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काल म्हणजेच १५ जुलै रोजी रात्री १२ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMTH) ते अंबरनाथ या लोकल ट्रेनमध्ये जागा मिळवण्याच्या (Seat Controversy) कारणावरून तीन प्रवाशांमध्ये भीषण वाद झाला. डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, एका प्रवाशासोबत झालेल्या या वादात अन्य दोन प्रवासी, लाथाबुक्क्यांच्या व शारीरिक मारहाणीत गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या रक्तरंजित राड्यानंतर डब्यात एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तात्काळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुंबईच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भयानक घटनेच्या काही तास आधीच, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ “चर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी” या कॅप्शनसह मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये, लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात अत्यंत खचाखच भरलेल्या गर्दीत उभे राहण्याच्या जागेवरून आणि एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवाशांचे गट आपापसात भिडल्याचे दिसत आहे. आजूबाजूचे इतर प्रवासी हा वाद मिटवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतानाच, काही जण एकमेकांवर हिंस्रपणे धावून जात लाथाबुक्क्यांचा मारा करत आहेत. एका सहप्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. मात्र, या विशिष्ट व्हिडिओबाबत रेल्वे प्रशासनाकडून किंवा रेल्वे पोलिसांकडून (GRP) अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि यातील दोषींवर काय कारवाई झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबई लोकल मधील या लागोपाठच्या घटनांनी प्रवाशांच्या मानसिक तणावाचा आणि असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून मयांक लोहार या २४ वर्षीय निष्पाप तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ती घटना ताजी असतानाच हा दुसरा रक्तरंजित प्रकार घडल्याने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेटकऱ्यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत, “मुंबईकरांचा रोजचा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर, मानसिकदृष्ट्या तणावपूर्ण आणि असुरक्षित होत चालला आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.









