Mumbai – Pune Expressway Traffic : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुण्याहून मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Expressway) अत्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोणावळा घाटात गेल्या पाच ते सहा तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, आज सकाळपासूनच हजारो प्रवासी या कोंडीमध्ये अडकले आहेत. कडक उन्हाळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रवाशांकडील पिण्याचे पाणीही आता संपले असून, या कोंडीत अडकलेल्या लहान मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या वाहतूक कोंडीची सुरुवात थेट खालापूर टोलनाक्यापासूनच झाली असून, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून दर २५-२५ मिनिटांचे ‘ब्लॉक’ घेतले जात आहेत.
घाटातील तीव्र चढावावर झालेल्या या अभूतपूर्व कोंडीमुळे अनेक वाहने अचानक रस्त्यातच बंद पडत आहेत. उन्हाचा पारा चढलेला असतानाच, वारंवार थांबून पुढे सरकावे लागत असल्याने चालकांना सतत ‘हाफ क्लच’वर वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे वाहनांची इंजिने प्रमाणाबाहेर गरम (Overheat) होऊन जागोजागी गाड्या बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, आधीच संथ असलेल्या वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावला आहे. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी अनेक प्रवाशांनी द्रुतगती मार्गावरील ‘फूड मॉल’ येथे थांबणे पसंत केले; परंतु तेथील वाहनतळही पूर्णपणे भरल्यामुळे तेथेही वाहने उभी करण्यास जागा उरलेली नाही. अशातच, विद्युत वाहनांच्या (Electric Vehicles) मर्यादित बॅटरी क्षमतेमुळे ती रस्त्यातच बंद पडण्याची भीती असल्याने या वाहनधारकांनी अधिक धोका न पत्करता रस्त्याच्या कडेलाच वाहने थांबवून ठेवणे पसंत केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण सावळागोंधळामुळे प्रवाशांमध्ये सरकार आणि प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्हीआयपी (VIP) हालचालींमुळेच ही वाहतूक कोंडी अधिक वाढल्याचा आरोप संतप्त प्रवाशांनी केला आहे.











