Farmers Protest : कष्टाने पिकवलेल्या कांद्याला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील बळीराजा कमालीचा संतप्त झाला असून, या प्रश्नावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) राज्यव्यापी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये आंदोलन हिंसक वळण घेत असतानाच, पोलिसांनी आमदार रोहित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे. राज्याच्या विविध भागांत ‘रस्ता रोको’ आंदोलनांमुळे महामार्गावरील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती.
चांदवडमध्ये ‘आक्रोश महामोर्चा’ आणि पोलिसांची धरपकड
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. कांद्याला किमान २४ रुपये हमीभाव मिळावा आणि विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १५ रुपये अनुदान मिळावे, या मुख्य मागण्यांसाठी हा ‘आक्रोश महामोर्चा’ काढण्यात आला. आंदोलक नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली जेव्हा आंदोलकांनी महामार्गावरील वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतले.
सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र: रोहित पवारांचा ‘ऑपरेशन टायगर’वरून निशाणा
आंदोलनादरम्यान बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “एककीकडे शेतकरी संकटात असताना सत्ताधारी नेते मुंबईत नगरसेवक फोडण्यात आणि जागावाटपाच्या चर्चेत व्यस्त आहेत. नाफेडमध्ये केवळ सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांचाच कांदा खरेदी केला जात आहे.” सुमारे ६ हजार शेतकऱ्यांना पोलिसांनी आंदोलनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अडवून धरल्याचा दावाही त्यांनी केला. “अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे सरकार न्याय देऊ शकले नाही, तिथे सर्वसामान्यांचे काय होणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढण्याचा इशारा दिला.
सोलापूर आणि संभाजीनगरमध्ये सरकारचा धिक्कार
सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुणे-हैदराबाद महामार्ग रोखून धरला. यावेळी केंद्र सरकारवर तोफ डागताना खासदार शिंदे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून चालत असून, त्यांना अदानींचे कर्ज माफ करायला पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्यायला मात्र सवलत नाही.”
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर बाजार समितीत विदारक चित्र पाहायला मिळाले. कांद्याला प्रति किलो अवघा सव्वा रुपया दर मिळाल्याने शेतकरी लक्ष्मण दुशिंग यांच्यासह अनेक उत्पादकांचा संताप अनावर झाला. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपला सर्व कांदा महामार्गावर फेकून दिला आणि ‘रास्ता रोको’ करत सरकारचा धिक्कार केला.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कांद्याच्या निर्यातीवर असलेली बंधने आणि सरकारी खरेदीतील पारदर्शकतेचा अभाव यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.











