Sunil Tatkare : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लवकरच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असून, ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्रीपद सोपवले जाणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. त्यातच जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या चर्चांना अधिक खतपाणी घालणारी ठरली. या अत्यंत संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
जयंत पाटील यांच्या भेटीमध्ये काहीही वावगे नाही-
जयंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या गोपनीय भेटीबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी अत्यंत समंजस भूमिका मांडली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय समीकरण दडलेले असेल असे मला वाटत नाही. जयंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. ते सलग सातवेळा विधानसभेवर निवडून आले असून त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे मतदारसंघातील किंवा विकासाच्या विविध शासकीय कामांसाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. या भेटीत मला काहीही गैर किंवा वावगे वाटत नाही.”
शरद पवारांच्या एनडीएतील संभाव्य प्रवेशाबाबत बोलताना तटकरे म्हणाले, “पवार साहेब हे गेल्या सहा दशकांपासून राज्य आणि केंद्रातील राजकारणाचा एक प्रमुख केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या पक्षाचा विस्तारही राष्ट्रीय पातळीवर आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला स्वतःच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आणि कोणासोबत युती करायची, हा अंतिम निर्णय घेण्याचा संपूर्ण लोकशाही अधिकार आहे.”
“एकनाथ शिंदे मित्रपक्षांचा आदर करणारे नेते; अर्थखात्यावर आमचाच दावा कायम”
राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) महत्त्वाचे असलेले अर्थखाते मिळू नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी एकनाथ शिंदेंची पाठराखण केली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपदही अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळले आहे. ते इतर मित्रपक्षाला विशिष्ट खाते किंवा विभाग देऊ नये, अशी संकुचित भूमिका घेतील असे मला अजिबात वाटत नाही. शिंदे हे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि विशिष्ट पद्धतीने राजकारण करणारे मोठे नेते आहेत. मित्रपक्षाला काय मिळावे किंवा काय मिळू नये, याबद्दल ते माझ्याशी नकारात्मक बोलल्याचे गेल्या तीन वर्षांत मला कधीही जाणवले नाही. आमचे त्यांच्याशी आणि संपूर्ण शिवसेना पक्षाशी अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत.”
याच वेळी सुनील तटकरे यांनी अर्थखात्यावरील आपल्या पक्षाचा दावा पुन्हा एकदा अत्यंत ठामपणे बोलून दाखवला. “राज्यातील महत्त्वाचे अर्थखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावे, ही आमची पूर्वीपासूनची आग्रही मागणी आहे. या संदर्भात आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. ही भेट झाल्यानंतर इतरही काही महत्त्वाच्या राजकीय व प्रशासकीय बाबींवर सकारात्मक चर्चा केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा रंगल्याने पक्षात धुसफूस निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी तातडीने रात्रीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीस यांनी इथून पुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याची किंवा मंत्र्यांची भेट घेताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्याचे वृत्त समोर आले होते.










