Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा फार मोठी बंडखोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ठाकरे गटाचे तब्बल ६ खासदार पक्षापासून वेगळे झाले असून, त्या पाठोपाठ विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनीही मोठी बंडखोरी केली आहे. या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर तीक्ष्ण शब्दांत प्रहार केला आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिर उभारणीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि दरोडेखोरीच्या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. येत्या रविवारी, ५ तारखेला सायंकाळी ४ वाजता दादर येथील हनुमान मंदिरासमोरून (कबुतरखान्याजवळ) या आंदोलनाला सुरुवात होणार असून उद्धव ठाकरे यांनी तमाम रामभक्तांना व हिंदूंना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भाजपच्या सत्तेचे मूळ राम मंदिर; हिंदुत्वाच्या त्यागाचे भाजपकडून भांडवल-
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज संपूर्ण देश भाजपच्या अंमलाखाली आहे आणि त्यांच्या या अमर्याद सत्तेचे मूळ राम मंदिर आंदोलनात दडलेले आहे. राम मंदिरासाठी जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा देशातील सामान्य हिंदू आणि शिवसैनिक त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोध्रा हत्याकांड, अहमदाबादमधील दंगली आणि मुंबईतील बॉम्बस्फोट यांसारख्या भीषण घटनांमध्ये हिंदू समाजाने अतोनात सोसले आहे. याच संघर्षाचे भांडवल करून भाजपने आपली राजकीय पोळी भाजली. राम मंदिर आंदोलनात उतरण्यापूर्वी भाजपचे संसदेत केवळ दोन खासदार होते आणि त्यांचे धोरण ‘गांधीवादी समाजवाद’ असे होते. परंतु, तो विचार सोडून त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज त्याच बळावर ते देशात अमर्याद सत्ता भोगत आहेत.”
आमदार-खासदार फोडण्यासाठी राम मंदिरावर दरोडा?
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकीय कार्यपद्धतीवर आणि राम मंदिराच्या सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आज प्रभू श्रीरामाचे मंदिर एका वेगळ्याच आणि लाजीरवाण्या कारणासाठी चर्चेत आले आहे. तिथे उघडपणे दरोडेखोरी आणि चोरी सुरू आहे. इतर पक्षांचे आमदार आणि खासदार फोडले जात आहेत आणि या पक्षांतराला ‘ऑपरेशन’ असे नाव दिले जात आहे. आता भाजप थेट ‘ऑपरेशन राम मंदिर’ करत आहे का, असा प्रश्न पडतो. माध्यमांमधून या बातम्या दाखवल्या जावोत अथवा न जावोत, पण तिथे चोरी होत आहे हे सत्य आहे. काहींच्या मते, राम मंदिराच्या नावाखाली गोळा होणारा पैसा हा इतर राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरला जात असून हा थेट राम मंदिरावर टाकलेला दरोडा आहे.”
९० च्या दशकातील वाजपेयींच्या विधानाचा संदर्भ: “अब हिंदू माफ नही करेगा”
९० च्या दशकातील भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कडक इशारा दिला. ते म्हणाले, “त्या काळात वाजपेयी म्हणाले होते की, ‘अब हिंदू मार नही खायेगा’. आज त्या धर्तीवर मी देशाला सांगू इच्छितो की, ‘अब हिंदू माफ नही करेगा’. प्रभू श्रीरामाचे मंदिर लुटणारे भाजपचे लोक असोत वा अन्य कोणी, हिंदू समाज त्यांना कदापि माफ करणार नाही आणि त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देईल. या अन्यायाविरुद्ध आणि लुटमारीविरुद्ध आम्ही रविवारपासून संघर्षाची सुरुवात करत आहोत.”










