मुंबई- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेकडो मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यासोबतच अहमदनगर-कल्याण महामार्गावर देखील सकल मराठा समाज टाकळी खातगावच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. आंदोलना दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.