श्रीनगर – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरु असताना आज केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेपाठोपाठ(मसरत आलम ग्रुप) तहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली.
अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रतिबंधीत कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देऊन भारतविरोधी प्रचार करत होती. नरेंद्र मोदी यांचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण आखले आहेे. त्यामुळे अनलॉफुल एक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन एक्ट अंतर्गत या संघटनेवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.