नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यानजिकच्या गांधीसागर अभयारण्यात दक्षिण आफ्रिकेतून पाच ते आठ चित्ते लवकरच दाखल होणार आहेत.
या वर्षी पावसाळ्यानंतर हे चित्ते गांधीसागर अभयारण्यात आणण्यात येणार आहेत. चित्त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता हा प्रकल्प राबवित आहे. गांधीसागरमध्ये पाच ते आठ चित्ते आणण्याबाबत आवश्यक पूर्वतयारीची चाचपणी करण्यासाठी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून एक प्रतिनिधी मंडळ भारतात आले होते.
गांधीसागर अभयारण्य हे ३६८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. त्यातील ६४ चौरस किलोमीटर क्षेत्र कुंपण घालून सुरक्षित करण्यात आले आहे. या सुरक्षित क्षेत्रात दक्षिण आफ्रिकेतून आणले जाणारे चित्ते सुरुवातीला सोडण्यात येणार आहेत. या चित्त्यांना येथील वातावणाची सवय झाली आणि ते व्यवस्थितपणे शिकार करून जगू लागले की टप्प्या टप्प्याने त्यांना सुरक्षित क्षेत्राच्या बाहेरील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
प्रजननक्षम वयातील हे नर आणि मादी चित्ते पावसाळ्यानंतर गांधीसागर अभयारण्यात सोडण्यामागे त्यांचे प्रजनन घडवून आणण्याचा उद्देश आहे.