श्रीनगर- जम्मू – काश्मीरमधील गुलमर्ग आणि पहलगाम या बर्फाच्छादित खोर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये यंदा पहिल्यांदाच बर्फाचा दुष्काळ पडला आहे.हिवाळ्यात बर्फवर्षाव न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.त्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होत आहे.प्रामुख्याने हिवाळ्यात नयनरम्य दिसणारे गुलमर्ग शहर ओसाड आणि कोरडे पडल्याचे दिसत आहे.
दरवर्षी हिवाळ्यात याठिकाणी साधारण ४ ते ६ फुट जाडसर बर्फाची चादर पसरल्याचे दिसते.जमिनीचा एक इंचही भाग कोरडा दिसत नाही.मात्र यंदा जमिनीवर बर्फ नसल्याने हा परिसर कोरडाच दिसत आहे.कोरड्या वातावरणामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे हवामान खात्याने म्हणणे आहे.ही स्थिती महिनाभर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जमिनीवर बर्फ नसल्याने पर्यटकांनी गुलमर्गच्या सहली रद्द करण्यास सुरुवात केली आहे.२ फेब्रुवारीपासून होणार्या ‘ खेलो इंडिया ‘ या हिवाळी खेळांवरही अत्यल्प हिमवर्षावाचा परिणाम होऊ शकतो.