ठाणे – ठाण्यातील हिरानंदानी भागात असलेल्या मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आज पहाटे आग लागली.यात मढवी कुटुंबातील ५ जण अडकले होते. त्यापैकी दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर ३ जण सुखरूप बाहेर पडले. प्रणाली मढवी (३०), कविश मढवी (१४), पलाश मढवी (१२) हे तिघेही घरातून सुखरूप बाहेर पडले. मात्र, घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेले अभिमन्यू मढवी (६०) आणि रमाबाई मढवी (५५) हे दाम्पत्य आगीत अडकले. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना आगीतून बाहेर काढले, परंतु धूर व आगीमुळे दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यांना नजीकच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.