सातारा
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याने धोम बलकवडी कालव्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यामुळे खंडाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करत आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणीसाठी ग्रामस्थांनी खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने धोम बलकवडी कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडले.
खंडाळा तालुक्यात पुरेसे पर्जन्यमान न झाल्यामुळे खंडाळा तालुका टंचाईग्रस्त घोषित करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्यातील धोम बलकवडी कालव्याच्या जवळच्या गावातही टंचाई घोषित करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर धोम -बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अजित पाटील यांनी वरिष्ठांशी व संबंधित खात्याशी संपर्क साधून धोम-बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्याबाबत हालचाली केल्या. त्यानुसार धोम बलकवडी कालव्यातून खंडाळा तालुक्यात पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले. दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्यानंतर पाणी वापर उपसा करण्यावर कडक निर्बंध करण्यात आले आहेत. धोम बलकवडीच्या कालव्यातून पाणी सोडल्याने खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई व जनावरांच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.