देवगड
सिंधुदूर्गात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण होवून बरेच दिवस लोटले, मात्र या महामार्गावरील सर्वात महत्वाच्या नांदगांव तिठ्यावर अजूनही ठेकेदाराने प्रवाशी निवारा छप्पर बांधलेले नाही. यामुळे देवगडकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकरणी महामार्ग ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
नांदगांव तिठ्ठयावरून देवगडला जायला मार्ग असल्याने देवगडला येणारे प्रत्येक प्रवाशी नांदगांव तिठ्ठयावर उतरतात. मात्र, उभे राहण्यासाठी छप्पर नसल्याने प्रवासी उड्डाण पुलाच्या खाली उभे राहतात आणि गाडी दिसल्यावर धावत गाडीजवळ येतात. वृध्द, अपंग, महिला, गर्भवती महिला, विद्यार्थी, रूग्ण यांचे प्रचंड हाल होतात. बऱ्याच वेळा धावत जावून थांबविलेली गाडी वेगळीच असते. त्यामुळे त्यांना वाहनचालकाच्या रोषाला सामोरे जावे लागते. उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाड्यांचे अवैध पार्किंग असल्याने उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांना अरूंद रस्ता शिल्लक राहतो. तेथे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसात देवगडला येणारी एसटीसाठी भिजत उभे राहावे लागते.त्यामुळे या तिठ्ठयावर प्रवाशी निवारा शेड उभारण्याची तातडीने गरज आहे. तसेच फोंड्याकडे जाणाऱ्या मार्गालाही दुसरी प्रवाशी शेड उभारणे गरजेचे आहे.