नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.भारतीय रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वेच्या तिकीटदरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे.देशभरात ज्या ‘एक्स्प्रेस, स्पेशल’ किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत, अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे.
कोरोनाच्या संकटात रेल्वे प्रशासनाने विविध सोयी सवलती बंद केल्या होत्या.तसेच वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता काही गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.या गाड्या बंद केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.या तिकीटदर वाढीचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. त्यानंतर लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर वाढलेले तिकीटदर कमी करावे,अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत होती. यासंदर्भात रेल्वे अधिकारी आणि प्रशासनाकडे देखील मोठ्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता तिकीटदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे तिकिट दर होते, त्याच प्रमाणे वाढलेले तिकीट दर रेल्वेने खाली आणले आहेत. तिकीटदरात कपात केल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते.त्यामुळे अतिरिक्त गाड्या सोडण्याचाही विचार केला जात आहे.