लखनौ
बंडखोर उर्दू कवी मुनव्वर राण यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणा यांना किडनीचा त्रास होत असल्याने लखनौमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राणा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मुनव्वर यांच्या निधनाने त्यांच्या उर्दू साहित्यविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
मुनव्वर राण यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली या गावात झाला होता. ते उर्दू, हिंदी आणि अवधी भाषांमध्ये ते लिखाण करत. त्यांच्या खास शैलीतल्या गझल आजही लोकांच्या स्मरणात आहेत. उर्दू साहित्यातल्या योगदानासाठी २०१४ मध्ये त्यायांना साहित्य अकदामी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसंच २०१२ मध्ये त्यांना माटी रतन सन्मान देऊनही गौरवण्यात आलं होतं. २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडून साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही अशीही प्रतिज्ञा त्यांनी केली होती. राणा साहित्यासह राजकारणातदेखील सक्रिय होते.
२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी मुन्नवर राणा म्हणाले होते की, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही. या सरकारच्या मनात आले तर मुस्लिमांना राज्य सोडायला लावतील. २०२० मध्ये एका व्यंगचित्रावरुन वाद होऊन फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली. ही कृती योग्य असल्याचे म्हटल्यानेही राणा वादात सापडले होते.