नागपूर :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला साल २०२१-२०२२ या वर्षामध्ये एका महिला बचत गटाला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले होते. या बचत गटाकडून निकृष्ट पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात आला होता. स्वच्छता न राखणे, लाडूची पॅकिंग व्यवस्थित न करणे असा ठपका लेखापरीक्षण अहवाल ठेवण्यात आला आहे
सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते. निकृष्ट दर्जाचा लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
ज्या ठिकणी लाडू बनवला जातोय ती जागा फार अस्वच्छ आहे. लाडूची बुंदी सुकवण्यासाठी कळकटलेली ताडपत्री वापरली जाते. लाडूच्या पाकिटावर जे घटक असल्याचे लिहिले जाते ते प्रत्यक्षात त्यात वापरले जात नाहीत. शिवाय प्रसाद म्हणून एका पाकीटात तीन लाडू भरले जातात आणि २० रुपयांना विकले जातात. या लेखापरीक्षण अहवालामध्ये लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा लाडू प्रसाद न देणे, शेंगदाणा तेला ऐवजी सरकी तेलाचा वापर करणे, पुरेशा प्रमाणात ड्रयफू्टस न वापरणे, स्वच्छता न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्याचे बीएसजी अँड असोसिएट्सने लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद केले आहे.
सध्या मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.