Vijay Mallya | फरार उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) सध्या त्याच्या ट्विट्स आणि वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आरसीबीच्या आयपीएल विजयानंतर मल्ल्याकडून सातत्याने ट्विट केले जात आहे. याशिवाय, पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत भारतातून फरार होण्याआधी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे.
‘फिगरिंग आऊट’ (Podcast) या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत मल्ल्याने सांगितले की, तो जेटली यांना देश सोडण्यापूर्वी भेटला होता आणि त्यांना जेनेव्हा (Geneva) येथे एका बैठकीसाठी जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आणि त्यामुळे तो भारतात परतू शकला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
मुलाखतीदरम्यान मल्ल्याला विचारण्यात आले की 1 मार्च 2016 रोजी तो दिल्लीत होता आणि 2 मार्च रोजी संसदेला गेला. दुसऱ्या दिवशी त्याला सर्वोच्च न्यायालयात हजर राहायचे होते, हे खरे का? यावर उत्तर देताना मल्ल्याने या गोष्टी फेटाळल्या आणि तो कोणत्याही कोर्टाच्या समन्सच्या अधीन नव्हता, असे सांगितले.
“मी विमानतळावर जाण्याआधी जेटली यांना भेटलो होतो. त्यानंतर मी लंडनमार्गे जेनेव्हाला जाणार होतो. FIA वर्ल्ड कौन्सिल या बैठकीसाठी माझी उपस्थिती महिनेभर आधीपासून निश्चित होती,” असे मल्ल्याने स्पष्ट केले.
त्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ही माहिती माध्यमांतून बाहेर आली, तेव्हा अरुण जेटली यांनी सुरुवातीला या भेटीचा इन्कार केला. मात्र काँग्रेसच्या एका खासदाराने त्यांना दोघांना भेटताना पाहिल्याचे सांगितल्यानंतर जेटलींना आपले विधान बदलावे लागले. त्यानंतर जेटली म्हणाले होते की, हो, भेट झाली होती, पण ती खूपच थोड्या वेळासाठी.
मल्ल्याने हेही सांगितले की, त्याचा देशातून पळून जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. “मी 32 वर्षांपासून इंग्लंडचा स्थायी रहिवासी आहे. भारतात 180 दिवसांपेक्षा अधिक राहण्याची परवानगी नाही. मी नेहमीप्रमाणे प्रवास करत होतो. मी जेट एअरवेजच्या फ्लाइटने गेलो आणि त्याआधी अर्थमंत्र्यांना याबाबत सांगितले होते,” असे तो म्हणाला.
त्याच्या म्हणण्यानुसार, तो बँकांशी सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नात होता. “मी जेटलींना सांगितले होते की, मी जेनेव्हामध्ये आहे, मी परत येईन, बँकांना सांगा की माझ्यासोबत बसून सेटलमेंट करा. पण त्याऐवजी त्यांनी माझा पासपोर्ट रद्द केला. पासपोर्टशिवाय मी प्रवास कसा करणार?” असा सवालही त्याने उपस्थित केला.
विजय मल्ल्याने यापूर्वीही असे दावे केले आहेत, मात्र अनेक वर्षांनंतर त्याने प्रथमच एका मुलाखतीमध्ये अशा स्पष्टपणे याबाबत भाष्य केले. मल्ल्या राज्यसभेचा माजी खासदार राहिला आहे आणि त्याच्यावर सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या कर्ज थकबाकीप्रकरणी अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. 5 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने त्याला ‘फरार’ घोषित केले होते.