Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, यावेळी ठाकरे गटाला आपल्याच बालेकिल्ल्यात भगदाड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन साजरा होत असतानाच, पक्षाच्या 9 पैकी 6 खासदारांनी महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये धाराशिवचे आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेला आणि पक्षांतराच्या चर्चांना आता खुद्द ओमराजे निंबाळकर यांनीच पूर्णविराम देत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या शक्यतेवर बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
“लोकांची कामे होत नसतील तर जनतेला कसे सामोरे जाऊ?”; निंबाळकरांचा सवाल
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
केवळ भावनिक विचार करून राजकारण चालत नाही. भावना बाजूला ठेवून मतदारसंघाच्या भविष्याचा आणि राजकीय वास्तवाचा विचार केला, तर माझा निर्णय योग्यच वाटेल. मी सध्या पुण्यात आहे. 20 जून रोजी माझे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या खटल्याचा न्यायालयीन निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यानंतर तातडीने धाराशिवला जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि पुढील पाऊल उचलेन, असे ते म्हणाले.
आज समोरच्या बाजूला प्रचंड सत्ता आणि ताकद आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा उरली आहे. पण जर या निष्ठेच्या जोरावर मी माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडू शकत नसेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा काय उपयोग? मी आणखी किती दिवस कोरड्या हाताने फिरणार, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
महायुतीचे नेते मैदानात, मग आपले नेतृत्व का शांत?
ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत निंबाळकर यांनी महायुती आणि त्यांच्या पक्षात असणारा फरक स्पष्ट केला:
- विरोधकांची अहोरात्र मेहनत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता आणि बहुमत असतानाही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते अगदी विधानपरिषदेच्या जागांपर्यंत ते स्वतः फिरत आहेत आणि रात्रं-दिवस मेहनत घेत आहेत.
- आदित्य ठाकरेंनी फिरायला हवे होते: उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांना जास्त प्रवास करणे शक्य नाही, ही गोष्ट पूर्णपणे समजण्यासारखी आहे. मात्र, अशा परिस्थितीत किमान युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तरी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता. नेत्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, पण दुर्दैवाने आपल्या पक्षात तसे घडताना दिसले नाही.
खोक्यांचे आरोप चुकीचे; हा निर्णय विकासासाठी
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहाराच्या आणि कोटींच्या ऑफरच्या आरोपांचा निंबाळकर यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.
पैसे घेतल्याच्या सर्व चर्चा पूर्णपणे खोट्या, बिनबुडाच्या आणि तथ्यहीन आहेत, असे निंबाळकर म्हणाले. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी सत्ता आणि पैशाला कधीही महत्त्व दिले नाही. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नसून, धाराशिव मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांच्या हितासाठी घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










