पुणे – राज्यभरात विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी चिंता वाढली असताना, पुण्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड येथील एका महिलेला मुलगी झाली म्हणून पुण्यात सासरच्या मंडळींनी १५ दिवस उपाशी ठेवत छळ केला. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचा विवाह १ जून २०२१ रोजी झाला होता. लग्नात तिच्या माहेरून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक छळ सुरू केला. या प्रकाराची माहिती तिने ४ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या आई-वडील व भावाला दिली. त्यानंतर माहेरच्यांनी तिला बीडला परत आणले.
काही काळाने दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक झाली आणि परिस्थिती बदलल्याचे वाटल्याने महिला १३ मार्च २०२३ रोजी पुन्हा सासरी परतली. त्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र सासरच्यांना मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी तिचा पुन्हा छळ सुरू केला. तिला १५ दिवस अन्न न देता उपाशी ठेवले गेले. , २३ मे २०२५ रोजी सासरच्यांनी तिला व तिच्या लहान मुलीला घराबाहेर काढले. त्यामुळे ती माहेरी परत गेली आणि लगेचच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पतीसह चौघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.