Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात ( Air India Plane Crash) शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हे विमान थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमधील इमारतीवर कोसळले होते. या घटनेनंतर आता अपघाताच्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या अनेक गोष्टी सापडत आहे. स्थानिक नागरिकांनी या वस्तू जमा करून प्रशासनाकडे सोपवले आहेत.
या भीषण अपघातात 250 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लंडनला जाणारं AI171 बोइंग 787 ड्रीमलायनर (Boeing 787 Dreamliner) टेकऑफनंतर काही मिनिटांतच मेघानी नगरमधील वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं, ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. या संकटात ट्रेनी डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पुढे येऊन जीव वाचवण्यासाठी धावपळ केली.
या अपघाताने बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला आग लागली आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. विमानाचा तुटलेला फ्युजलेज आणि भडकलेली आग यामुळे प्रवाशांच्या आणि रहिवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या घटनेनंतर अनेक स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे आले होते.
स्थानिक बांधकाम व्यावसायिक राजू पटेल आणि त्यांच्या टीमने अपघातस्थळी धाव घेतली, पण आगीच्या तीव्रतेमुळे सुरुवातीला जवळ जाणं शक्य झालं नाही. “पहिली 15 ते 20 मिनिटं आम्ही जवळही पोहोचू शकलो नाही. आग खूप भयंकर होती,” असं पटेल यांनी सांगितलं.
फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स येऊन मदतकार्याला सुरुवात झाल्यावर पटेल यांच्या टीमने ढिगाऱ्यांमधून शोधमोहीम हाती घेतली. त्यांना 70 तोळे सोनं, 80,000 रुपये रोख, एक भगवद्गीता आणि काही पासपोर्ट्स सापडली. या सर्व वस्तू त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं की, या वस्तूंची नोंद घेण्यात आली असून, लवकरच त्यांच्या मालकांना परत केल्या जाणार आहेत.
हा अपघात भारतातील सर्वात भीषण विमान दुर्घटनांपैकी एक आहे. स्थानिक नागरिक आणि फर्स्ट रिस्पॉंडर्सच्या (First Responders) तत्परतेमुळे अनेकांना मदत मिळाली, पण मृतांचा आकडा हृदयद्रावक आहे. तपास यंत्रणा या अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.