नवी दिल्ली – इराण आणि इस्रायलदरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत सरकारने तातडीने पावले उचलत ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ११० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे.
हे विद्यार्थी उत्तर इराणमधील उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. त्यामध्ये जम्मू-कश्मीरमधील ९० विद्यार्थी असल्याची माहिती आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ते तेहरानहून येरेव्हान (आर्मेनिया) मार्गे विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. १८ जून रोजी उड्डाण झाल्यानंतर हे विमान आज पहाटे नवी दिल्लीत पोहोचले.तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांतून या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जम्मू-कश्मीर सरकारने विद्यार्थ्यांच्या घरी परतीसाठी विशेष बसांचीही व्यवस्था केली होती.परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य धोक्याचा सामना करणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारतात परतलेल्या एक विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही २० तासांचा प्रदीर्घ आणि थकवणारा प्रवास करून भारतात पोहोचलो आहोत. त्यानंतर आता पुन्हा बसने २० तास प्रवास करणे आणि ते देखील अशा जुन्या बसमध्ये शक्यच नाही.