Shashi Tharoor admits differences with Congress | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी विविध देशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा थरूर हे देखील भाग होते. त्यानंतर थरूर आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. आता अखेर स्वतः त्यांनी पक्षनेतृत्वासोबत काही मुद्यांवर मतभेद असल्याचे म्हटले आहे.
केरळमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांनी भाग घेतला नव्हता. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, केरळमधील निलंबूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांनी भाग घेतला नाही, कारण पक्ष नेतृत्वाने त्यांना कधीच प्रचारासाठी आमंत्रित केले नाही. यावेळी त्यांनी पक्षाशी काही किरकोळ मतभेद असल्याचे मान्य केले.
निलंबूर पोटनिवडणुकीच्या प्रचारातील अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी विचारले असता, थरूर म्हणाले, “मला पक्षाने प्रचारासाठी बोलावलेच नाही. पण हरकत नाही.” 20 जून 2025 रोजी या महत्त्वाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. “मी एका राजनैतिक दौऱ्यावर बाहेर होतो. परत आल्यावर पक्ष नेतृत्वाकडून प्रचारासाठी कोणताही निरोप आला नाही,” असे ते म्हणाले.
16 वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या थरूर यांनी सलग चारवेळा तिरुवनंतपुरममधून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाशी काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात, पण ते अंतर्गत चर्चेतून सुटतात, असे स्पष्ट केले. “मतभेत असले तरी, काँग्रेसच्या मूल्यांशी मी कटिबद्ध आहे. काही मतभेद असतील तर ते बंद दाराआडच्या चर्चेतून सोडवले जातील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजनैतिक दौरा आणि वाद
दरम्यान, थरूर नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी पाच देशांच्या राजनैतिक दौऱ्यावरून परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही निर्णयांचे कौतुक केल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यूपीए सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राईकचे महत्त्व न अधोरेखित केल्याबद्दलही पक्षातील काही सहकारी नाराज झाले होते.