Prasad Vedpathak Video: मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटीच्या आवारात ओढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला अंतर्गत वाद आता संपूर्ण मुंबईभर चिघळला आहे. हा वाद मिटल्याचा दावा आधी केला गेला असला, तरी आता या प्रकरणाला तीव्र धार्मिक आणि राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणावर पहिल्यांदा आवाज उठवणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने आता एक अत्यंत धक्कादायक आणि भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये प्रसादने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असून आपल्यासोबत काहीही बरं-वाईट घडू शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
“माझा पाठलाग केला जातोय”; व्हिडीओमध्ये प्रसादने मांडली व्यथा
प्रसाद वेदपाठकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो कमालीचा अस्वस्थ आणि भावूक झालेला पाहायला मिळत आहे:
- घरी येऊन धमक्या: ४ तारखेला वाद झाल्यानंतर ९ तारखेला ती पट्टी हटवण्यात आली होती. मात्र, ११ तारखेला स्थानिक माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना पत्र देऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर काही लोक सतत आमचा पाठलाग करत असून घरी येऊन धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
- खोट्या एफआयआरची भीती: माझ्याविरोधात भलत्याच संदर्भातील खोटे गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. माझ्या नावावर खोट्या अफवा पसरवून एक नकारात्मक वातावरण तयार केले गेले आहे.
- शेवटचा व्हिडीओ असू शकतो: “कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल, मला नाही माहीत पुढे काय होणार आहे,” अशी भीती व्यक्त करत प्रसादने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना साकडं आणि मनसेचे आभार
प्रसादने या कठीण काळात केवळ मनसेनेच आपल्याला पूर्ण पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने राज ठाकरे, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांचे आभार मानत, जर आपल्या जीवाला काही झाले तर सत्य समोर आणा, अशी विनंती केली.
सोबतच, त्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे जाहीर आवाहन केले आहे. “मी कसा कष्ट करून इथपर्यंत पोहोचलोय, हे मुख्यमंत्र्यांनी जाणून घ्यावे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आमच्याच जमिनीवर आम्हाला दाबले जात असून मी केवळ आवाज उठवला होता,” असे प्रसाद म्हणाला.
नेमका काय आहे हा ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद?
या संपूर्ण वादाची सुरुवात घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ या सोसायटीमधून झाली होती:
वाद विकोपाला गेला: या विरोधानंतर ती पांढरी पट्टी तातडीने हटवण्यात आली. मात्र, त्यानंतर हा वाद मुंबईत ‘मराठी विरुद्ध जैन’ असा सोशल मीडियावर पसरला. आता या प्रकरणी प्रसादवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत असून त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील मास रिपोर्टिंग करून सस्पेंड पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परवानगीशिवाय रेघ मारली: जैन धर्मगुरूंसाठी सोसायटीच्या आवारात कोणाचीही परवानगी न घेता एक पांढरी पट्टी (रेघ) मारण्यात आली होती.
प्रसादचा आक्षेप: प्रसाद वेदपाठकने या गोष्टीला तीव्र विरोध केला होता आणि यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला होता.










