लोकलला तातडीने स्वयंचलित दरवाजे बसवा! हायकोर्टाची सूचना

bombay high court

मुंबई– मुंबईतील मध्य रेल्वे (Central Railway l) मार्गावरील लोकलमधून प्रवासी खाली पडण्याचे प्रमाण गंभीर आहे. प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होणे ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे लोकलला तातडीने स्वयंचलित दरवाजे (automatic doors) बसवावेत, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली. उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे (Chief Justice Alok Aradhe) आणि न्यायमूर्ती संदीप मारणे (Justice Sandeep Marne.)यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी ९ जून रोजी मुंब्रा येथे झालेली दुर्घटना अधोरेखित करण्यात आली असता, न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना जारी दिली.

तुम्ही जे काही उपाय केलेत ते पुरेसे नाहीत, असे दिसते. धावत्या रेल्वेमधून पडून प्रवासी मरत आहेत. दररोज सुमारे १० प्रवासी अपघातात मरतात. तुमच्या स्वतःच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे न्यायमूर्ती मारणे यांनी सुनावणीवेळी म्हटले. आम्हाला फक्त एवढेच कळते की भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, असे मत मुख्य न्या. आराधे यांनी व्यक्त केले. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले की, वेळोवेळी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत आणि ९ जूनच्या घटनेनंतर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅक डिवायडर बसवणे, फूटबोर्ड आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर कमी करणे आणि फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी अन्न आणि पुस्तकांचे स्टॉल हटवावे. तथापि खंडपीठाने त्यावर असमाधान व्यक्त केले आणि लवकरात लवकर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना दिली व या कामासाठी रेल्वे प्रशासनाला मुदत देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.