‘कर्जमाफीचे आश्वासन पाळणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शेतकऱ्यांना आश्वासन

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

“शेतकऱ्यांना दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. काल (21 जून) पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वारकरी भक्तियोग’ आणि ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नुकतेच कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर आता कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

उच्चस्तरीय समितीची स्थापना

बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने 15 दिवसांत कर्जमाफीसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. या समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या सकारात्मक प्रतिसादामुळे कडू यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

महायुतीतील मतभेदांवर स्पष्टीकरण

कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात “कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी तरी दिले नाही!” असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी “कर्जमाफी मिळणारच” असे ठामपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सांगितले की, कर्जमाफीचे निर्णय नियम आणि पद्धतीनुसारच घेतले जातील, आणि सरकार एकसंध आहे.