पहलगाम हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तानमध्ये होणार क्रिकेटचा सामना? आशिया कपमध्ये भिडण्याची शक्यता

Asia Cup 2025

Asia Cup 2025 | पहलगाम येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंधात तणाव वाढला आहे. मनोरंजन विश्वापासून खेळाच्या मैदानापर्यंत, कोणत्याही स्तरावर पाकिस्तानशी संबंध न ठेवण्याचे आवाहन अनेकांकडून केले जात आहे. असे असले तरीही क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहेत.

बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही देशांचे सामने सुरू राहण्याची शक्यता आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, आगामी आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ने 2025 चा पुरुष आशिया कप T20 फॉरमॅटमध्ये युएईत आयोजित करण्याची तयारी केली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 10 सप्टेंबर 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि युएई हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी होतील.

रिपोर्टनुसार, भारताकडे यंदाच्या आशिया कपचे यजमानपद आहे, परंतु BCCI आणि PCB यांच्यातील करारानुसार भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातात. त्यामुळे युएई हे स्पर्धेचे ठिकाण निश्चित झाले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ACC ची बैठक होऊन वेळापत्रक जाहीर होईल.

5 ऑक्टोबर 2025 रोजी कोलंबो येथे महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाक सामना होणार आहे. त्यामुळे आता आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बीसीसीआय काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.