भुवनेश्वर – ओदिशातील (Odisha) पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान (Lord Jagannath) मोठी दुर्घटना घडली. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर नंदीघोष रथाजवळ चेंगराचेंगरी होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक भाविक जखमी झाले असून यातील ६ भाविकांची प्रकृती गंभीर आहे.
आज पहाटे या रथाच्या (Rath Yatra) दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली. यावेळी अचानक गोंधळ उडून अनेकजण जखमी झाले. यात बसंती साहू (३६), प्रेम कांती मोहंती (७८) आणि प्रभात दास यांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले. अपघातानंतर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.
२७ जून रोजी चार वाजता जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली. प्रथम भगवान बलभद्रचा रथ ओढण्यात आला. त्यानंतर देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांचे रथ पुढे नेण्यात आले. पहिल्या दिवशीही गर्दीमुळे ६२५ भाविकांना त्रास झाला होता. काहींना चेंगराचेंगरी, तर काहींना उन्हामुळे त्रास झाला होता. त्या दिवशी ७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ९ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रथयात्रेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी सकाळी ११.२० वाजता बलभद्रांचा तलध्वज रथ, दुपारी १२.२० वाजता सुभद्रांचा दर्पदलन रथ आणि दुपारी १. ११ वाजता भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ गुंडीचा मंदिरात (Gundicha Temple) पोहोचला होता.
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक यांनी या चेंगराचेंगरीबद्दल सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गर्दीचे व्यवस्थापन करण्याची सरकारची कुठलीही व्यवस्था नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यामुळे सरकारच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.