बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची परळीत तहसील कार्यालय परिसरात २० ऑक्टोबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात असल्याचा खळबळजनक दावा कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर याने केला. त्यानंतर ८ दिवसांत आरोपींना अटक झाली नाही तर मी मोठा निर्णय घेणार, असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलिसांना दिला.
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना ३० जूनपर्यंत मी मुदत दिली होती. अजून आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणात काल विजयसिंह बांगर याने अनेक खुलासे केले आहेत. बांगरचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी. त्याला आरोपी कोण आहेत, याची माहिती आहे. त्याची फिर्याददेखील घ्यावी. तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक सानपची देखील चौकशी करावी. या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली. पण अजून एकही अधिकारी भेटण्यास आला नाही. बांगरने आरोपीचे नाव घेतले आणि माझ्या पतीचे मांस टेबलवर ठेवल्याचे सांगितले. तरीदेखील कावत शांत का आहेत? ते आरोपीची पाठराखण का करत आहेत? पोलिसांना आमचे एकच आवाहन आहे. त्यांनी बांगरचा जबाब घ्यावा आणि आरोपीला अटक करावी. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल.