नवी दिल्ली – १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान (Pakistan) विरुध्द युध्दांसह कारगिल संघर्ष (kargil war) आणि अगदी अलीकडच्या ऑपरेशन सिंदूरपर्यंत (Operation Sindoor) देशाच्या अनेक महत्त्वाच्या लढायांमध्ये अतुलनीय योगदान देणारे मिग-२१ (MiG-21) लढाऊ विमान ६२ वर्षांनंतर येत्या सप्टेंबर महिन्यात हवाई दला (air force) च्या सेवेतून निवृत्त (retired) होत आहे. १९ सप्टेंबर रोजी चंदिगड हवाई तळावर आयोजित समारंभात या विमानाला सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
१९६३ साली हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेली मिग-२१ लढाऊ विमाने मागील ६२ वर्षांत भारतीय हवाई दलाचा महत्त्वाचा भाग होती. मात्र गेल्या काही वर्षांत या विमानाचे सातत्याने अपघात होत राहिले. चारशे अपघात आणि तेवढेच वैमानिक गमवावे लागल्याने मिग-२१ विमानाच्या नावाला बट्टा लागला. फ्लाईंग कॉफिन अर्थात उडती शवपेटी अशी या विमानाची ओळख तयार झाली. ती हवाई दलाच्या ताफ्यातून मागे घेण्याची अनेकदा मागणी झाली होती. विशेष म्हणजे, रशियाने हे विमान १९८५ मध्येच निवृत्त केले आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही ते निवृत्त केले आहे. मात्र, आजही भारत हा देश मिग-२१ विमानांचा ताफा असलेला सर्वात मोठा देश आहे.