Ahmedabad plane crash : अहमदाबादमध्ये एअर इंडिया(Air India) च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात (Ahmedabad plane crash) प्राथमिक चौकशीच्या आधारे वैमानिकांना (Pilots)दोषी धरणे दुर्दैवी गोष्ट आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त केली.
१२ जून रोजी अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात एअर इंडियाचे बोईंग विमान कोसळले होते. या भीषण अपघातात वैमानिक,प्रवासी आणि विमान कोसळलेल्या ठिकाणी असलेले असे एकूण २६५ लोक मृत्यूमुखी पडले. या घटनेला शंभर दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप केवळ अपघातासंबंधीचा प्राथमिक अहवाल आला आहे. या अहवालात अपघाताचे नेमके कारण आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, यावर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. विमानातील इंधनाचा स्वीच रन ऐवजी कट ऑफ वर ठेवण्यात आला, असा वैमानिकांकडे बोट दर्शवणारा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या हवाई सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सेफ्टी मॅटर्स फाऊंडेशन (एसएमएफ)या स्वयंसेवी संस्थेने यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्या. सूर्य कांत आणि न्या. एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने प्राथमिक चौकशी अहवालात वैमानिकांना जबाबदार धरण्यावर तोंडी निरीक्षण नोंदवून विमान अपघात तपास संस्थेचे (एएआयबी) महासंचालक आणि नागरी विमान उड्डाण खात्याचे महासंचालक यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्यास सांगितले. मात्र अपघाताच्या तपासाचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्याची याचिकाकर्त्याची विनंती न्यायालयाने अमान्य केली. अपघाताचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा ही याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करता येईल. तपास हा निष्पक्षपातीपणेच झाला पाहिजे. मात्र तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण तपशील जाहीर करण्याची विनंती मान्य करता येणार नाही, असे न्याायलयाने सांगितले.
तपास पूर्ण होण्याआधीच बेजबाबदारपणे वैमानिकांना दोषी धरणे चुकीचे आहे. त्यामुळे वैमानिकाच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागेल, असे न्या. सूर्य कांत म्हणाले.
हे देखील वाचा –
ईशान्य भारताकडे काँग्रेसचे दुर्लक्ष इटानगरमध्ये पंतप्रधानांची टीका