Raj Thackeray– ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच बॉम्बे की मुंबई हा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईशी काही संबंध नसलेले काश्मीरचे भाजपा नेते, केंद्रीय विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत येऊन आयआयटीच्या समारंभात म्हटले की, आयआयटीने बॉम्बेचे नाव मुंबई केले नाही याचा मला आनंद आहे. त्यांचे हे वक्तव्य ऐकून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) संतप्त झाले. त्यांनी ट्विट करीत म्हटले की, हाच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. ’मुंबई’ नको ’बॉम्बे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे! तेव्हा मराठी माणसा जागा हो, आता तरी डोळे उघड असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
भाजपाने मात्र असा कुठलाही डाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पण निवडणुकीच्या प्रचारात हा विषय आता गाजणार आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे हे फ्रीस्टाईल आरोप करतात. महाराष्ट्राची जनता ही फडणवीस यांच्या पाठीशी आहे. ही जनता यू टर्न घेणार्या नेत्याच्या मागे जाणार नाही . भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, राज ठाकरे यांची मुले बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत शिकली, स्कोरिंग विषय म्हणून त्यांनी जर्मन भाषा निवडली त्याबाबत राज ठाकरे काही बोलणार का? भाजपा नेते बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांना विकास दिसत नसून मुंबई किंवा स्थानिक निवडणुका जवळ आल्या की त्यांना केवळ गुजरात आणि बुलेट ट्रेनच दिसते. त्यांना विकास दिसत नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही. रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या या फालतू गोष्टींमध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही. आमचा रस जनतेच्या विकासात आहे.
आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुक, ट्विटर यावर निवेदन प्रसिद्ध केले. त्यात राज ठाकरे म्हणाले की, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले, त्याचे मुंबई केले नाही, हे चांगले झाले असे विधान केले. जितेंद्र सिंह यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे, असे स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशके यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे! खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून… पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणार्या तमाम मराठी जनांना माझे आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना मुंबई हे नाव खटकते. कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरे म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसे. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदीगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ’बॉम्बे’च हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे हे आपण रोज पाहतो आहोतच! दरम्यान, आपल्या निवेदनाच्या शेवटी राज ठाकरे यांनी आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली.दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या बॉम्बेला पाठिंबा देणार्या भूमिकेनंतर मनसेने आज आयआयटी मुंबईसमोर आंदोलन केले. पवई आयआयटी बाहेर बॉम्बेवर फुली मारून मुंबई लिहिलेले बॅनर लावत निषेध नोंदवला.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –









