Anjali Damania on Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी गटातील नेत्यांच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय घर मिळवल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची २ वर्षांची शिक्षा कायम राहिल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे.
याच जागेवर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यांनी नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या संभाव्य निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.
अमित शाह यांच्या भेटीवर दमानियांचा प्रहार
धनंजय मुंडे आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही, असे म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शाह मला म्हणजे एका भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्याला भेटायला वेळ देत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
मात्र, दुसरीकडे ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना मात्र ते आवर्जून वेळ देतात, यातून जनतेने काय ते समजून घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या या दुटप्पी धोरणामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची जंत्री
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध करताना त्यांच्यावरील गंभीर आरोपांची यादीच प्रसिद्ध केली आहे. मुंडे यांच्यावर असलेल्या खालील ६ प्रमुख आरोपांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे:
१. बीड जिल्हा बँक घोटाळ्याचे गंभीर आरोप. २. राजकारणात बंदूक संस्कृती किंवा बंदूक राज आणल्याचा आरोप. ३. महाजेन्कोमधून मोठ्या प्रमाणात राख चोरल्याचा आरोप. ४. आवदा कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण. ५. कृषी विभागात झालेल्या कथित घोटाळ्याचे आरोप. ६. संपूर्ण जिल्ह्यात दहशत, गुंडाराज आणि बंदुकराज पसरवल्याचे गंभीर आरोप.
ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा , मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 17, 2025
ह्यात काय ते समजून जा….
भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत
ज्या… pic.twitter.com/LEG0gYoFWx
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मुख्यमंत्र्यांना इशारा
दमानिया यांनी आपल्या प्रतिक्रियेत अत्यंत खळबळजनक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या. त्यांनी आरोप केला की, ज्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर पुन्हा राज्याचे मंत्री बनले, तर ती लोकशाहीची थट्टा ठरेल. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचा मंत्रिमंडळात समावेश करणे हे महाराष्ट्रासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, जर फडणवीसांनी आपल्या कार्यकाळात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, तर मी या जन्मी त्यांना कधीही माफ करणार नाही. अशा प्रवृत्तींना पाठबळ देणाऱ्या भाजपवर लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. या इशाऱ्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे यांचा समावेश होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









