Mangesh Kalokhe Case: रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, या प्रकरणावरून महायुतीमधील दोन मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येसाठी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जबाबदार धरत खळबळजनक वक्तव्य केले आहे.
सुनील तटकरे हेच ‘आका’; सुतारवाडीत शिजला प्लॅन?
आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येचे धागेदोरे थेट सुनील तटकरे यांच्या घरापर्यंत जोडले आहेत. थोरवे यांनी आरोप केला की, “सुनील तटकरे हे रायगडचे ‘आका’ आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून जिल्ह्यात रक्तरंजित राजकारण सुरू आहे.
मुख्य आरोपी रवींद्र देवकर याने हत्येच्या 4 ते 5 दिवस आधी सुतारवाडी येथे जाऊन तटकरे यांची भेट घेतली होती आणि त्याच भेटीत मंगेश काळोखे यांना संपवण्याचा कट रचण्यात आला.” राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत हा ‘प्री-प्लान’ गेम झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळोखे कुटुंबीयांना भेट
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीत जाऊन पीडित काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यांच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई करावी, अशी आर्त हाक मुख्यमंत्र्यांकडे दिली.
यावर बोलताना शिंदे म्हणाले की, “मी काळोखे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ज्यांनी जनतेने निवडून दिले, त्यांच्यावर सूड उगवणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही, त्यांना ठेचून काढू.”
पोलिस तपास आणि आरोपींना अटक
पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना नागोठणे परिसरातून थरारक पाठलाग करून अटक केली आहे. सुधाकर घारे यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
तटकरेंनी आरोप फेटाळले
सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निर्दयी आहे, परंतु अशा गंभीर विषयावर राजकारण करणे योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.









