Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा धाक आता पाकिस्तानने जाहीरपणे मान्य केला आहे. मे 2025 मध्ये भारताने केलेल्या या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे मोठे लष्करी नुकसान झाले असल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दिली आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निरपराध नागरिकांची हत्या केली होती, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते.
नूर खान एअर बेसवर भारताचा अचूक निशाणा
इशाक दार यांनी वर्षाच्या अखेरीस घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की, भारतीय ड्रोन्सनी रावळपिंडीतील ‘नूर खान एअर बेस’वर जोरदार हल्ला केला होता. दार यांच्या दाव्यानुसार, भारताने अवघ्या 36 तासांच्या कालावधीत सुमारे 80 ड्रोन्स पाकिस्तानच्या हद्दीत पाठवले होते. यापैकी 79 ड्रोन्स पाडण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी एका ड्रोनने एअर बेसला धडक दिली, ज्यामुळे तेथील लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले आणि अनेक जवान जखमी झाले.
ऑपरेशन सिंदूर: 11 एअर बेस भारताच्या निशाण्यावर
केवळ रावळपिंडीच नाही, तर भारताने या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानच्या एकूण 11 एअर बेसवर हल्ले केले होते. यामध्ये सरगोधा, रफीकी, जेकोबाबाद आणि मुरीदके येथील प्रमुख हवाई तळांचा समावेश होता. सॅटेलाईट फोटोंमधून या तळांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला पाकिस्तानने हे नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता त्यांच्याच सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी हे सत्य स्वीकारले आहे.
भारतीय लष्करी तज्ज्ञांनी फेटाळला पाकिस्तानचा दावा
पाकिस्तानने त्यांचे केवळ ‘किरकोळ’ नुकसान झाल्याचे म्हटले असले तरी, भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात खोटे बोलत असून नुकसान कितीतरी पटीने जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ढिल्लन यांनी पाकिस्तानच्याच टीव्ही चॅनेलच्या एका वृत्ताचा दाखला दिला, ज्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या 138 पाकिस्तानी जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यावरून मृतांचा आकडा लपवल्याचे स्पष्ट होते.
22 एप्रिलच्या त्या काळरात्रीनंतर भारताने 7 मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. पहिल्या टप्प्यात पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही यापूर्वी या हल्ल्याची पुष्टी केली होती.









