Cold Wave Warning In Maharashtra : उत्तरेकडून अतिवेगाने सरकणाऱ्या शीतलहरींमुळे देशभरात थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने १२ जानेवारीला राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारतात तीव्र थंडीचा इशारा दिला आहे. उत्तर-पश्चिम भारतात किमान तापमानात मोठी घसरण होत असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम जाणवण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली असून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहरींसदृश स्थिती आता निर्माण झाली आहे. या भागांत पहाटे आणि सकाळच्या वेळेत थंडी जास्त जाणवणार असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटे दाट धुक्याची शक्यता असून, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि अंतर्गत महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसचा चढ-उतार अपेक्षित असला, तरी संपूर्ण आठवडा थंडीत जाण्याचा प्राथमिक अंदाज देखील आता हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात देखील तापमानात सातत्याने चढउतार येताना दिसत आहे. गोंदिया शहरात पुन्हा एकदा ९.५ इतकी कमी तापमानाची नोंद केली आहे. तर ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ३१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले आहे.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेली वादळी प्रणाली सध्या कमकुवत असल्याचे दिसून येते. तिचा परिणाम प्रामुख्याने तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांवर दिसून आला आहे.









