Devendra fadnavis – आज मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या ठाकरे बंधूंच्या सभेतील आरोपांना जोरदार उत्तर दिले. फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे जुने व्हिडिओ झळकावले. याशिवाय देशातील बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांची अदानीबरोबरची छायाचित्रे दाखवून त्यांनी आपल्या राज्यात कोट्यवधीची गुंतवणूक कशी आणली, याची यादी वाचून दाखवली. फडणवीस यांनी असे आवाहन केले की, मुंबईकरांचा पैसा मुंबईसाठी वापरण्यासाठी आणि घोटाळेबाजांना तुरुंगात पाठवण्यासाठी महायुतीला निवडून द्या.
फडणवीस यांनी आपल्या भाषणातून राज आणि उद्धव ठाकरे यांनी काल उपस्थित केलेल्या एकेक मुद्याचे उत्तर दिले. ते म्हणाले की, आधी म्हणायचे की हिंदी सक्तीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्रावर माशेलकर समिती तयार झाली. या समितीत उबाठाचे नेते विजय कद देखील होते. या समितीच्या अहवालात इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी असे नमूद केले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला. त्याच्यावर उद्धव ठाकरे यांची सही आहे.
मुंबई विमानतळ बंद करायचा असल्याने नवी मुंबई विमानतळ तयार करण्यात आला. या आरोपावर फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, जागा कमी पडत होती. म्हणूनच नवी मुंबईत नवीन विमानतळ बांधला. मी राजकारणात येण्याआधीच त्याची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. आता तिसरेही विमानतळ बांधणार आहोत. लंडनला तीन विमानतळ आहेत, तर मुंबईत का नाही? त्यामुळे तुम्हाला मुंबईतच लंडनसारखे वाटेल आणि तुम्ही लंडनला जाणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाची क्षमताही दीडपट करणार आहोत.
मुंबईसाठी 25 वर्षांत तुम्ही काय केले, असा सवाल फडणवीस यांनी ठाकरेंना केला. ते म्हणाले की, आम्ही मुंबईकरांसाठी मेट्रो आणली. कोस्टल रोड केला. ईलेक्ट्रिक बसेस आणल्या. गरिबांना घरे दिली. तुम्ही धारावी प्रकल्प बाजूला ठेवला होता. आम्ही तो आणला. तुम्ही फक्त श्रेय घेण्याचे काम केले. खोटे बोल, पण रेटून बोल ही तुमची पद्धत आहे. 2014 नंतर अदानींची संपत्ती कशी वाढली, हे तुम्ही दाखवले. पण देशातील भाजपाच्या नसलेल्या मुख्यमंत्र्यांनीही अदानीकडून कोट्यवधीची गुंतवणूक मिळवली आहे. हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा आपण कुठल्या जमान्यात आहोत? तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जाईल. इथे रोजगार कसा मिळणार? वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वप्न बघितले नाही. पण आम्ही मुंबईकरांना रोजगार हे आमचे स्वप्न आहे. यासाठी अदानी असो किंवा कोणी असो आम्ही त्यांचे स्वागत करू.
चुनाव नहीं तो घरमें
चुनाव आया तो मुंबई खतरेमे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंवर हल्लाबोल करताना म्हणाले की, काल काही जण टीका करून गेले. पण मी त्यांना माझ्या कामातून उत्तर देणार. आता भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण लोकांना हवे आहे. आम्ही तेच करतो आहोत. काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणसांची आठवण येते. एरवी ही लोक मराठी माणसांसाठी उभे राहत नाहीत. दिवसभर नेटफ्लिक्स अन् जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. यांचे पाच साल घर मे और चुनाव आए तो मराठी खतरे मे’ असे आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट तर आमचं डेव्हलपमेंट फर्स्ट हे व्हिजन आहे. मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करतो आहोत. हे विकासविरोधी लोक आहेत. आमच्यातील वादापेक्षा मराठी आमच्यासाठी मोठा आहे. मग वेगळे का झाला होता? त्यावेळी तुम्हाला बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करावीशी नाही वाटली का? तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात अन् स्वार्थासाठीच एकत्र आलात हे मराठी माणसांना माहिती आहे. यांच्यापासून सावध होण्याची गरज आहे.
————————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा
मुंबई महाराष्ट्राची नाही!” भाजप नेते अण्णामलाईंच्या विधानाने राजकारण पेटले
महाराष्ट्रात तीव्र थंडीचा तडाखा! मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात लक्षणीय घट
शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक भाजपाला पडला भारी; शिवसेना शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा दावा..









