Rohit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले आणि अवघ्या राज्यावर शोककळा पसरली. २९ जानेवारीला बारामतीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अजितदादांच्या निधनाला काही दिवस उलटत नाहीत तोच राजकीय वर्तुळात त्यांच्या मृत्यूच्या कारणांवरून विविध शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.
या वादावर आता पवार कुटुंबातील सदस्य आणि आमदार रोहित पवार यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांची कळकळीची विनंती
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित सर्वांना हात जोडून विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अजितदादा आपल्यातून गेल्याचे दुःख खूप मोठे आहे. अशा वातावरणात राजकीय चर्चा करणे अजिबात योग्य नाही. दादांचा स्वभाव स्पष्ट आणि परखड होता. त्यांच्या आत्म्याला क्लेश होईल किंवा त्यांच्या विचारांना ठेच लागेल, असे भाष्य तूर्तास कुणीही करू नये. भविष्यात चर्चा करण्यासाठी वेळ मिळेल, पण ही ती वेळ नाही.”
माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2026
नेमका वाद काय?
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक बड्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे:
- संजय राऊत: खासदार संजय राऊत यांनी १५ जानेवारीच्या एका संदर्भाचा उल्लेख करत या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी राज्यसभेतही या प्रकरणाची तुलना जुन्या गंभीर प्रकरणांशी केली.
- विजय वडेट्टीवार: काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
- छगन भुजबळ: शोककळेत असतानाही छगन भुजबळ यांनी “विमान पलटी कसे झाले? काहीतरी गडबड आहे,” असे म्हणत चौकशीची गरज बोलून दाखवली.
- अमोल मिटकरी: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या सर्व राजकीय चिखलफेकीमुळे पवार कुटुंबीय व्यथित झाले असून, रोहित पवार यांनी कुटुंबाची बाजू मांडत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.











