PM Modi on NDA MP : संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली. एका बाजूला संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत असतानाच, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना शिस्तीचे धडे देत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत कडक शब्दांत तंबी दिली आहे.
पंतप्रधानांचा खासदारांना शिस्तीचा संदेश-
भाजप संसदीय दलाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या अनुपस्थितीवर कडक नाराजी व्यक्त केली. “चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभागी व्हा,” अशा शब्दांत त्यांनी खासदारांना फटकारले. कोट्यवधी कार्यकर्त्यांमधून तुमची निवड होऊन तुम्हाला सभागृहात बसण्याची संधी मिळते, तिचे सोने करा, असा उपदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी निशिकांत दुबे यांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांच्याकडून सभागृहात बसण्याची शिस्त शिका, असे सांगतानाच कॅन्टीनमध्ये वेळ घालवणाऱ्या सदस्यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला.
संसदेत गदारोळ आणि कामकाजात व्यत्यय-
दुसरीकडे, संसदेच्या दोन्ही सभागृहात सातव्या दिवशीही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अमेरिकन करार आणि माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अवघ्या ६५ सेकंदातच स्थगित करावे लागले. त्यानंतर दुपारी १२ आणि २ वाजता कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र गदारोळामुळे ते वारंवार तहकूब झाले.
राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध-
राज्यसभेतही राहुल गांधींच्या भाषणाचा मुद्दा चांगलाच गाजला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेचे सभापती मल्लिकार्जुन खरगे यांना उद्देशून म्हटले की, राहुल गांधी नियमांचे पालन करत नाहीत, हे त्यांना स्पष्ट करण्याची गरज आहे. यावर सभागृह नेते जेपी नड्डा यांनी हस्तक्षेप करत सांगितले की, लोकसभेच्या कामकाजावर राज्यसभेत चर्चा करणे उचित नाही. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “पक्षाला एका ‘अबोध बालकाचे’ ओलीस (Hostage) बनवू नका.” या शाब्दिक चकमकीनंतर संतप्त विरोधी खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
प्रस्ताव मंजूर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु गदारोळ इतका भीषण होता की पंतप्रधानांना त्यावर अधिकृत प्रतिसाद देता आला नाही. पंतप्रधानांच्या भाषणाविनाच हा प्रस्ताव संमत करण्यात आला असून, आज ते राज्यसभेत भाषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संसदेच्या या सातत्यपूर्ण गोंधळामुळे लोकशाहीतील महत्त्वाच्या चर्चांऐवजी केवळ आरोप-प्रत्यारोपांचेच राजकारण रंगताना दिसत आहे.









