Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहित पवार यांनी प्रेजेन्टेशन दाखवलं. यामध्ये मुंबई ते बारामतीचं अंतर 210 किमी सांगण्यात आलं. या प्रवासासाठी 27 मिनिटे लागतं, असं म्हटलं. तसेच विमानाची माहिती या प्रेजेन्टेशनमध्ये देण्यात आली. विमान कंपनीचे विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे दोन मालक असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. याशिवाय त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
“तो घातपाताचा प्रयत्न होता का?” रोहित पवारांचा खळबळजनक संशय
आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केवळ या अपघाताच्या तांत्रिक बाजूवरच बोट ठेवले नाही, तर यामागे एखादे मोठे षडयंत्र असण्याची शक्यताही वर्तवली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या आणि अजित पवार यांच्यातील भूतकाळातील घनिष्ठ संबंधांचा हवाला देत या प्रकरणातील गूढ वाढवले आहे.
आर्थिक कंत्राटे आणि राजकीय वादाची किनार
रोहित पवार म्हणाले की, “या अपघातापूर्वी काही महिने आम्ही सातत्याने एकत्र होतो. मी स्वतः अजित पवार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. त्या काळात एका राजकीय सल्लागाराचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू होती.” एका मोठ्या आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेला हा वाद आणि त्यानंतर घडलेला हा अपघात, यांचा परस्पर संबंध असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
“घातपाताचा कट होता का?” – गंभीर प्रश्न उपस्थित
या आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी थेट ‘घातपाता’चा प्रश्न उपस्थित केला. “विशिष्ट हितसंबंध जपणाऱ्या व्यक्तींचे कोट्यवधींचे कंत्राट धोक्यात आल्यामुळे, हा अजित पवार यांच्या जीवावर बेतणारा कट तर नव्हता ना? असा अत्यंत टोकाचा आणि गंभीर प्रश्न त्यांनी विचारला आहे.
याशिवाय रोहित पवार यांनी आपल्या सादरीकरणात मुंबई ते बारामती या प्रवासाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यांच्या दाव्यानुसार, मुंबई ते बारामती हे साधारण २१० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी त्या विमानाला केवळ २७ मिनिटे लागली. विमानाचा वेग आणि प्रवासाचा कालावधी पाहता, या प्रक्रियेत काही तांत्रिक विसंगती तर नव्हती ना, असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
विमान कंपनीच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह-
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा खुलासा करताना रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्या कंपनीच्या विमानाने हा प्रवास झाला, त्या कंपनीचे मालक विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे आहेत. या कंपनीची पार्श्वभूमी आणि त्यांना मिळालेली कंत्राटे यावरही त्यांनी बोट ठेवले असून, यामागे काही विशिष्ट हितसंबंध गुंतले आहेत का, याची चौकशी होण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
प्रवासाचा वेग आणि सुरक्षेचा मुद्दा-
रोहित पवार यांनी आपल्या सादरीकरणात विमानाची तांत्रिक वैशिष्ट्ये आणि प्रवासादरम्यानचे ‘लॉग बुक्स’ यावरही प्रकाश टाकला. अत्यंत कमी वेळेत पार पडलेला हा प्रवास आणि त्यानंतर झालेला अपघात, ही केवळ योगायोग नसून त्यामागे गंभीर कारणे असू शकतात, असे त्यांनी ठळकपणे सांगितले. “नेमका अपघात कसा झाला आणि विमानाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची होती?” असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
अजित दादांबद्दल असलेल्या प्रेमापोटी आणि या घटनेमागचे सत्य जनतेसमोर यावे, या उद्देशाने ही माहिती संकलित केल्याचे रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “दादांना नेहमी घड्याळ घालण्याची सवय होती आणि ते आपले घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे ठेवायचे. मी स्वतः ते घड्याळ पाहिले आहे. दुर्दैवाने, जे घडू नये असे आपल्याला वाटत होते, तेच या अपघातात घडले आहे.”
प्रवासाचा तांत्रिक तपशील आणि विमानाची स्थिती-
रोहित पवार यांनी विमानांच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना सांगितले की, २१० किलोमीटरचे अंतर अवघ्या २७ मिनिटांत पार करण्यासाठी ‘लेअरजेट’ (Learjet) विमानाचा वापर करण्यात आला होता. हे विमान अत्यंत वेगवान आणि अधिक उंचीवरून प्रवास करण्यासाठी ओळखले जाते.
विमानाची रचना: अपघातावेळी दादा विमानातील डाव्या बाजूच्या आसनावर बसले असावेत, असा अंदाज त्यांनी वर्तवला. विमानाचा मागील भाग सामानासाठी वापरला जातो आणि तिथेच इंधन टाक्या (Petrol Tanks) असतात. शिवाय हे लेअरजेट विमान १६ वर्षे जुने असल्याचे देखील त्यांनी सांगिलते.
मालकी हक्क: या विमान कंपनीचे मालक विजयकुमार सिंग आणि रिमी सिंग असून, ‘विस्ता’ (Vista) मध्ये विजयकुमार व रोहिन यांच्यासह एकूण २७ भागधारक आहेत. ‘USR’ या कंपनीकडे सर्वाधिक लेअरजेट विमाने असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अपघातापूर्वीचा घटनाक्रम आणि चॅटमधील माहिती-
रोहित पवार यांनी मिनिटा-मिनिटाचा तपशील सादर करत सांगितले की:
१. सकाळी ७:०२: विमानाचा क्रू घटनास्थळी पोहोचला आणि हवामान स्वच्छ (Visibility) असल्याचे कळवण्यात आले.
२. सकाळी ७:१६: मुंबईवरून विमानाने उड्डाण (Takeoff) केल्याचा संदेश देण्यात आला. अधिकारी आणि स्वीय सहायकांच्या (PA) ग्रुप चॅटवर या प्रवासाच्या नोंदी होत्या. विमान लोणावळा, पुणे, यवत आणि सुपे मार्गे जात असतानाच ही दुर्घटना घडली.
३. सकाळी ९:००: विमानाला अपघात झाला असून ‘पापा’ (अजित दादा) जखमी आहेत, असा पहिला निरोप आला.
४. सकाळी ९:४५: त्यानंतर दुर्दैवाने दादांच्या निधनाची बातमी धडकली.
देखरेखीबाबत संशय आणि स्थानिकांचे दावे-
विमान कंपनीच्या मालकांनी दावा केला होता की, विमान सुस्थितीत होते, त्याची देखरेख (Maintenance) उत्तम होती आणि वैमानिक देखील अत्यंत अनुभवी होते. धुक्यामुळे हा अपघात झाला असावा, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेतला आहे. घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा आवाज इतर विमानांपेक्षा वेगळा आणि असामान्य येत होता. यावरून विमानाची देखरेख योग्य पद्धतीने झाली होती की नाही, याबाबत त्यांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वीच हे विमान सुरत येथे जाऊन आले होते, ही माहितीही त्यांनी यावेळी दिली.
“सत्य बाहेर येणे गरजेचे आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तांत्रिक बिघाड, विमानाचा वेग आणि देखरेखीतील त्रुटी या सर्व बाबी आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
या प्रकरणातील तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित खाजगी कंपनी यांच्यातील साटलोट्यामुळे पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अजित पवार विमान दुर्घटना: पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? रोहित पवारांचे ‘डीजीसीए’ आणि विमान कंपनीवर गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून आमदार रोहित पवार यांनी संशयाची सुई आता थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) वळवली आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, देखभालीच्या नोंदी आणि तपास यंत्रणांची कार्यपद्धती यावर त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
तांत्रिक नोंदी आणि ‘टेकलॉग’चा प्रश्न
रोहित पवार यांनी विचारले की, “विमान उड्डाणापूर्वी त्याची रीतसर तांत्रिक तपासणी झाली होती का? जर विमान एका विशिष्ट ठिकाणी बंद पडले होते, तर त्या विमानाचे ‘टेकलॉग’ (Tech-log) कुठे आहे?” विमानाची उड्डाणक्षमता आणि दुरुस्तीचा इतिहास ज्या पुस्तिकेत असतो, त्या ‘टेकलॉग’च्या उपलब्धतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमानाच्या हँगरभोवती (विमान उभे करण्याची जागा) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासणे अत्यंत अनिवार्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुराव्यांशी छेडछाडीची भीती
या प्रकरणात ‘डीजीसीए’चे काही अधिकारी संबंधित खाजगी कंपनीत कार्यरत असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी तपासाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे. “गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांनी केवळ सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मूळ तांत्रिक अहवाल बदलला जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड होण्याची आम्हाला दाट भीती वाटते,” असे ते म्हणाले. हा अपघात केवळ ‘धुके आणि कमी दृश्यमानता’ (Low Visibility) या कारणाखाली दडपण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
‘व्हीएसआर’ आणि प्रशासकीय यंत्रणांचे लागेबांधे
रोहित पवार यांनी २०१७ मधील एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. “२०२३ मध्ये याच ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमानाला मुंबईत अपघात झाला होता, परंतु इतका काळ लोटूनही त्याचा अंतिम तपास अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. यावरून असे स्पष्ट होते की, संबंधित कंपनीचा ‘डीजीसीए’वर मोठा प्रभाव किंवा ताबा असावा,” असा खळबळजनक संशय त्यांनी व्यक्त केला.
तपासाच्या दिशेवर प्रश्नचिन्ह
एका बाजूला तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळत असताना, दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांच्या संथ गतीमुळे आणि संशयास्पद हालचालींमुळे हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवार विमान दुर्घटना: “विमानातील इंधन कॅन म्हणजे फिरता बॉम्बच”; रोहित पवारांचे कंपनी मालकावर मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे आवाहन-
अजित पवार यांच्या अपघातामागे ‘व्हीएसआर’ विमान कंपनीचा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी अनेक धक्कादायक तांत्रिक बाबी उघड केल्या आहेत. या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा डागाळली असूनही भारतात मात्र त्यांना मोकळे रान दिले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बंदी आणि निकृष्ट कार्यपद्धती-
रोहित पवार यांनी सांगितले की, या कंपनीची विमाने लंडनपर्यंत उड्डाणे करतात. २०२३ मध्ये झालेल्या अपघाताची माहिती लंडनच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने मागितली होती, परंतु अहवाल न दिल्याने तिथे या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भारतात अद्यापही या कंपनीची उड्डाणे राजरोसपणे सुरू आहेत, हे अनाकलनीय आहे. कंपनीत काम करणाऱ्या माजी वैमानिकांच्या हवाल्याने त्यांनी सांगितले की, वैमानिकांना आवश्यक असलेली १२ तासांची विश्रांती दिली जात नाही आणि खर्चात कपात करण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’चे (SOP) उल्लंघन केले जाते.
तांत्रिक फेरफार आणि सुरक्षेचा अभाव-
विमानाच्या इंजिनची क्षमता २३०० तासांची असते, त्यानंतर ते बदलणे अनिवार्य असते. मात्र, कंपनी ‘लॉग बुक्स’मध्ये खोटी नोंद करून तेच जुने इंजिन वापरत असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच: कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर: विमानातील संवाद मुद्दाम बंद ठेवले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
टी-कास (TCAS) आणि इशारा यंत्रणा: विमान जमिनीच्या जवळ आल्यास मिळणारा धोक्याचा इशारा (Ground Proximity Warning) ‘पीटीटी’ (PTT) सिस्टिम सुरू असताना ऐकू येत नाही, ज्यामुळे अपघात ओढवला असावा.
इंधनाचे बेकायदेशीर कॅन: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही कंपनी विमानामध्ये पेट्रोलचे अतिरिक्त ५० लिटरचे कॅन ठेवते. विमान उडताना अशा प्रकारे इंधन सोबत बाळगणे म्हणजे ‘विमानात बॉम्ब ठेवण्यासारखेच’ आहे, असे पवार यांनी नमूद केले.
व्यावसायिक दबाव आणि मनुष्यवधाचा गुन्हा-
रोहित पवार यांनी दावा केला की, संबंधित विमान अजित दादांना बारामतीला सोडून तातडीने पटण्याला जाणार होते. या उड्डाणाचे १० लाख रुपये बुडू नयेत, यासाठी वैमानिकावर खराब हवामानातही विमान उतरवण्याचा दबाव होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या कंपनीच्या देखभाल विभागाचा प्रमुख ‘रमेश’ याची चौकशी का केली जात नाही, असा सवाल करत त्यांनी कंपनीच्या मालकावर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा’ (Culpable Homicide) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या अपघाताचा सखोल अभ्यास केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला आता ‘गुन्हेगारी कटा’चे (Criminial Conspiracy) स्वरूप दिले आहे. मंत्र्यांचे वेळापत्रक आणि विमानांची उपलब्धता नियंत्रित करणाऱ्या कंपन्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, २७ जानेवारीच्या रात्री घडलेल्या घडामोडींचा सविस्तर तपशील सादर केला आहे.
प्रवासाचे नियोजन आणि ‘ॲरो एव्हिएशन’ची भूमिका-
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, ‘साई’ आणि ‘ॲरो एव्हिएशन’ यांसारख्या कंपन्या मंत्र्यांच्या प्रवासाचे नियोजन करतात. त्यासाठी बनवलेल्या सोशल मीडिया ग्रुपवर मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि अधिकारी असतात.
नियोजनातील बदल: २७ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अजित पवार हे रस्तेमार्गे (गाडीने) प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या प्रवासाचे नियोजन बदलून विमानाने जाण्याचे निश्चित करण्यात आले.
विमान कंपनीचे लागेबांधे: या कंपनीच्या एका मालकाचे संबंध ‘पतंजली’सारख्या मोठ्या उद्योग समूहाशी असल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले, ज्यातून या कंपन्यांचे व्यावसायिक जाळे किती विस्तीर्ण आहे, हे स्पष्ट होते.
मंत्रालयातील ती ‘फाईल’ आणि प्रवासाला झालेला उशीर-
या संपूर्ण नाट्यात मंत्रालयातील एका फाईलचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. रोहित पवार म्हणाले की, “पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला एका महत्त्वपूर्ण फाईलवर अजित दादांची स्वाक्षरी हवी होती. ती फाईल मंत्रालयातून येण्यास विलंब झाला, त्यामुळे दादांना मुंबईतून निघण्यास उशीर झाला. जर ती स्वाक्षरी वेळेत झाली असती, तर कदाचित ते रस्तेमार्गे प्रवास करू शकले असते. मात्र, याच उशिरामुळे २८ तारखेला सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेण्यात आला.”
‘राइज अँड किल फर्स्ट’ आणि घातपाताचा संशय-
एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने रोहित पवार यांनी ‘राइज अँड किल फर्स्ट’ (Rise and Kill First) या जगप्रसिद्ध पुस्तकातील एका सिद्धांताचा उल्लेख केला. ते म्हणाले, “एखाद्या विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करायचे असेल, तर त्या व्यक्तीच्या चालकाला किंवा वैमानिकाला संकटात टाकणे हा एक मार्ग असतो.” या सिद्धांताचा आधार घेत, हा विमान अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
कोट्यवधींचे कंत्राट आणि घातपाताचा प्रश्न-
रोहित पवार यांनी सर्वात गंभीर आरोप केला तो आर्थिक हितसंबंधांवरून. ते म्हणाले, “अपघातापूर्वी आम्ही सातत्याने एकत्र होतो. त्यावेळी एका बड्या राजकीय सल्लागाराचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अजित दादा या कंत्राटाच्या विरोधात होते.” या आर्थिक वादामुळेच दादांचा खून करण्याचा कट रचला गेला का? असा थेट आणि खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार विमान दुर्घटना: वैमानिकांचे मद्यपान आणि तांत्रिक नोंदींमधील तफावत; रोहित पवारांचा तपासावर गंभीर प्रहार
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वैमानिकांच्या नियुक्तीबाबत अनेक गंभीर तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. नियोजित वैमानिक बदलण्यापासून ते विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील संशयास्पद नोंदींपर्यंत सर्वच बाबी संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
नियोजित वैमानिकांची अदलाबदल आणि मद्यपानाचा संशय-
रोहित पवार यांनी विचारले की, उड्डाणाच्या ऐनवेळी मुख्य वैमानिक का बदलण्यात आले? “मूळ नियोजनानुसार शाहिक मदन आणि यश हे दोन वैमानिक जाणार होते. ते वाहतूक कोंडीत अडकले होते असे सांगण्यात आले, परंतु ते नेमके कुठे होते? त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत का?” असा सवाल त्यांनी केला. या प्रवासाची जबाबदारी सोपवण्यात आलेले सुमीत कपूर हे नुकतेच सिंगापूरहून आंतरराष्ट्रीय विमानाने परतले होते. प्रवासापूर्वी त्यांची मद्यपानाची चाचणी (Pre-flight Medical) झाली होती का, यावर पवारांनी संशय व्यक्त केला आहे.
वैमानिक सुमीत कपूर यांची वादग्रस्त पार्श्वभूमी-
रोहित पवार यांनी वैमानिक सुमीत कपूर यांच्या वर्तणुकीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार:
१. निलंबनाची कारवाई: सुमीत कपूर यांना यापूर्वी मद्यपान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
२. अमेरिकेतून हकालपट्टी: ‘लेअरजेट’ विमानाचे प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना अमेरिकेला पाठवण्यात आले होते, परंतु तिथेही मद्यपानाच्या सवयीमुळे त्यांना अर्ध्यातूनच मायदेशी परत पाठवण्यात आले होते.
३. पूर्वीच्या तक्रारी: सत्तेतील एका वरिष्ठ नेत्याने नांदेडला प्रवास करताना याच वैमानिकाच्या वर्तनाबद्दल लेखी तक्रार केली होती. तरीही अशा ‘ब्लॅकलिस्टेड’ वैमानिकाकडे अजित पवारांच्या विमानाची सूत्रे का दिली गेली, असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. तसेच कंपनीच्या संचालकाचा मुलगा, कॅप्टन रोहित याच्या मद्यपानाबाबतचे संदेशही उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
तांत्रिक नोंदींमधील २० सेकंदांचा ‘गूढ’ फरक
विमानाच्या उड्डाण नोंदी आणि नियंत्रण कक्षाच्या संवादात मोठी तफावत असल्याचे रोहित पवार यांनी तांत्रिक पुराव्यांसह मांडले.
१. वेळेतील विसंगती: विमान सकाळी ८:१८ वाजता बारामती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (ATC) संपर्कात आले, परंतु ‘पीआयबी’च्या नोंदी ८:१९ अशी वेळ दर्शवतात.
२. अखेरचे शब्द: अपघातापूर्वी विमानातून ‘ओ शिट, ओ शिट’ असे उद्गार ऐकू आले होते. मात्र, प्रत्यक्ष घटनेच्या वेळेत आणि नोंदींमध्ये २० सेकंदांचा मोठा फरक आहे. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात २० सेकंद हा अत्यंत मोठा कालावधी असून, या काळात नक्की काय घडले आणि माहिती दडवली गेली का, याचा तपास होणे आवश्यक आहे.
हे केवळ योगायोग असू शकत नाहीत,” असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सुचित केले आहे. वैमानिकांच्या चारित्र्यापासून ते तांत्रिक आकडेवारीतील फेरफारापर्यंत सर्वच गोष्टी एका मोठ्या षडयंत्राकडे अंगुलीनिर्देश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची आता निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
अजित पवार विमान दुर्घटना: तांत्रिक माहिती दडवल्याचा संशय; आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी रोहित पवार आक्रमक-
आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानातील ‘ट्रान्सपॉन्डर’ (Transponder) यंत्रणेपासून ते धावपट्टीच्या निवडीपर्यंत अनेक तांत्रिक विसंगती समोर आणल्या आहेत. “हा केवळ अपघात नसून, एका पूर्वनियोजित कटाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
ट्रान्सपॉन्डरमधील गूढ आणि धावपट्टीचा संभ्रम
विमानाची सर्व माहिती आणि स्थान रेकॉर्ड करणाऱ्या यंत्रणेबाबत रोहित पवार यांनी मोठे प्रश्न उपस्थित केले:
१. यंत्रणा बंद पडली की पाडली?: विमानातील ट्रान्सपॉन्डर उड्डाणाच्या शेवटच्या एका मिनिटासाठी बंद होता. ही यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाली की जाणीवपूर्वक बंद केली गेली, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे.
२. धावपट्टीचा संशयास्पद बदल: सुरुवातीला सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘२९’ क्रमांकाच्या धावपट्टीची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन मिनिटांत वैमानिकाने अत्यंत अवघड अशा ‘११’ क्रमांकाच्या धावपट्टीची मागणी का केली? पठारी प्रदेशात विमान उतरवण्याची संधी उपलब्ध असताना, विमान मुद्दाम डोंगराळ भागाकडे का नेले गेले? यामागे विमान धडकवण्याचा निश्चित उद्देश होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित दादांच्या मनातील असुरक्षितता-
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वैयक्तिक सवयींमधील बदलांचा उल्लेख करत त्यांच्या सुरक्षिततेवर भाष्य केले. “गेल्या काही महिन्यांपासून दादा कमालीचे सावध झाले होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती. त्यांना ती बाटली तपासल्यानंतरच दिली जायची. ‘आजकाल बरंच काही घडतंय, स्वतःचं विमान घे,’ असं ते मला वारंवार सांगायचे,” असे रोहित पवार यांनी भावूक होत सांगितले. यावरून, स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे संकेत कदाचित त्यांना मिळाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी-
तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले की, “या प्रकरणाचा तपास केवळ सीआयडी (CID) कडे सोपवून चालणार नाही, कारण त्यांना पूर्ण अधिकार नसतात. वेळ काढूपणा केल्यास महत्त्वाचे कागदपत्र आणि पुरावे बदलले जाण्याची भीती आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी देशातील एक आणि परदेशातील एक अशा दोन निष्पक्ष तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी.”
रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे विमान वाहतुकीतील तांत्रिक सुरक्षा आणि राजकीय षडयंत्राकडे निर्देश करतात. धावपट्टीची चुकीची निवड, ट्रान्सपॉन्डरचा डेटा गायब होणे आणि अजित दादांना जाणवणारा धोका, या सर्व बाबी आता एका मोठ्या चौकशीच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही एक अत्यंत गंभीर घटना असून, त्याचे सत्य बाहेर येणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे.










