Devendra Fadnavis in Vidhansabha : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना इतिहासाच्या विकृतीकरणावर अत्यंत परखड आणि मार्मिक भाष्य केले. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील तुलनेच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. टिपू सुलतान हा राजा म्हणून कसा होता, हा वादाचा वेगळा विषय असू शकतो; परंतु त्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे आणि त्याला महाराजांपेक्षाही थोर ठरवण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक सत्याचा हवाला देत सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या मूळ इतिहासाशी जाणीवपूर्वक छेडछाड करण्यात आली आहे. “आपल्याला वर्षानुवर्षे हेच शिकवण्यात आले की टिपू सुलतान हा एक महान आणि आदर्श राजा होता. मात्र, इतिहासाची दुसरी काळी बाजू नेहमीच दडवून ठेवली गेली,” असे ते म्हणाले. टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची क्रूर कत्तल केली, हे सत्य शालेय पाठ्यपुस्तकांतून किंवा अधिकृत इतिहासातून कधीच समोर येऊ दिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ब्रिटीशांविरुद्धच्या लढाईबाबत बोलताना फडणवीस यांनी एक नवा दृष्टिकोन मांडला. टिपू सुलतान इंग्रजांशी लढला हे जरी सत्य असले, तरी तो लढा राष्ट्रप्रेमातून नसून केवळ स्वतःचे राज्य आणि सत्ता वाचवण्यासाठी होता, हे जनतेला कधीच सांगितले गेले नाही. केवळ ब्रिटीशांविरुद्ध लढला म्हणून त्याला ‘महान’ ठरवणे आणि त्याची तुलना रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे, हा महाराजांचा आणि त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा अवमान असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
“देशाचा खरा इतिहास आता जनतेसमोर येत आहे,” असे नमूद करत त्यांनी मागील शिक्षण पद्धतीवर जोरदार टीका केली. पूर्वी एनसीआरटीच्या (NCERT) पाठ्यपुस्तकांमध्ये मुघल साम्राज्याला तब्बल १७ पाने समर्पित केली जात असत, तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ एका परिच्छेदात आटोपता घेतला जात असे. मात्र, आता केंद्र सरकारने हा ऐतिहासिक अन्याय दूर करून मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला पाठ्यपुस्तकांत २० पानांचे स्थान दिले आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
इतिहासाच्या या उपेक्षेमुळेच समाजात चुकीचे आदर्श निर्माण झाले, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, जर योग्य वेळी खरा इतिहास शिकवला असता, तर आज देशातील एकाही मुस्लिमाने औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाला आपला नायक मानले नसते. देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांविषयी आपल्याला कोणताही आक्षेप नाही, परंतु जे लोक परकीय आक्रमकांना आणि देशद्रोही प्रवृत्तींना आपले ‘हिरो’ मानतील, त्यांना शासन कधीही पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सभागृहात दिला. इतिहासाशी झालेली ही छेडछाड आता थांबवून सत्याची कास धरणे काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
विरोधकांच्या भूमिकेवर तोफ डागताना फडणवीस यांनी त्यांना ‘भ्रमित आणि संभ्रमित’ असे संबोधले. राज्याच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना शांतपणे विचार करून बोलण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राच्या हितासाठी संभ्रमातून बाहेर पडून सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. “भारत लवकरच ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि भारताने ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच ओलांडला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा असून, देशपातळीवर पहिली ‘सब-नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ होण्याचा मान महाराष्ट्रच मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या भक्कम आर्थिक स्थितीची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र वार्षिक ३ लाख ६० हजार कोटी रुपयांचा जीएसटी जमा करतो, ज्याच्या आसपासही इतर कोणतेही राज्य नाही. कृषी निर्यात, सेवा क्षेत्र आणि परकीय गुंतवणूक यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही राज्याने अतिशय संतुलित राखले आहे.









