Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : दादांनी थांबवलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर; पक्षात नेमकं सुरू आहे काय? सुनील तटकरेंवर नाराजीचे संकेत?

Ajit Pawar : दादांनी थांबवलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर; पक्षात नेमकं सुरू आहे काय? सुनील तटकरेंवर नाराजीचे संकेत?

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक व अपघाती निधनानंतर पक्षांतर्गत...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक व अपघाती निधनानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार हयात असताना पक्षाच्या तीन प्रमुख विभागांच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले राजीनामे, जे तत्कालीन परिस्थितीत प्रलंबित ठेवण्यात आले होते, ते आता पक्षाकडून तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या राजीनाम्यांमागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

२६ जानेवारीचा तो घटनाक्रम-
या प्रकरणाची पाळेमुळे चालू वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाशी (२६ जानेवारी) जोडलेली आहेत. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजित पवार पक्ष कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. याच दरम्यान, पक्षाच्या तीन सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी एकत्रितपणे त्यांचे राजीनामे अजित पवारांकडे सुपूर्द केले होते. त्या वेळी ‘दादां’नी हे राजीनामे स्वीकारले नव्हते, तसेच त्यावर कोणतीही अधिकृत मोहोर उमटवली नव्हती. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता हे राजीनामे प्रदेश कार्यालयामार्फत स्वीकारण्यात आले आहेत.

राजीनामा देणारे प्रमुख पदाधिकारी-
पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेल्या नेत्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
१. मनोज व्यवहारे – प्रदेशाध्यक्ष, असंघटित कामगार विभाग.
२. सुभास मालपाणी – प्रदेशाध्यक्ष, उद्योग विभाग.
३. सचिन जाधव – प्रदेशाध्यक्ष, मोटार मालक वाहतूक संघटना.

पत्रातील खळबळजनक मजकूर आणि नाराजीचे कारण-
या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. पत्रातील आशयानुसार “लोकशाहीवादी पक्षात संघटनात्मक पातळीवर असमानता आणि न्यायालयीन तत्त्वांचा अभाव जाणवत आहे. वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या असहकार्यामुळे संघटना वाढवणे कठीण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पदावर राहणे अशक्य झाल्याने भविष्यातील हानी टाळण्यासाठी आम्ही पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नेत्यांचा थेट रोख प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे होता. वरिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची खंत या नेत्यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली होती. पत्राच्या शेवटी त्यांनी अजित पवारांनी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा ‘ऋणी’ असल्याचेही नमूद केले होते.

पुढील दिशा आणि पक्षापुढील आव्हान-
अजित पवारांसारख्या खंबीर नेतृत्वाच्या पश्चात, या तीन महत्त्वाच्या विभागांवर आता कोणाची नियुक्ती केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे या रिक्त जागी कोणाची वर्णी लावणार आणि पक्षातील ही अंतर्गत नाराजी थोपवण्यात त्यांना यश येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या