Gas Shortage Crisis: मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे गंभीर पडसाद आता मुंबईच्या हॉटेल उद्योगावर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसअभावी मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल्स आधीच बंद झाली असून, खवय्यांची मोठी गैरसोय होत आहे.
तीन दिवसांत ५० टक्के हॉटेल्स बंद होणार?
मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची संघटना असलेल्या ‘आहार’ (AHAR) कडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील तीन दिवसांत मुंबईतील ५० टक्के हॉटेल्सना टाळे लावावे लागू शकते.
हॉटेल व्यवसाय प्रामुख्याने कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने, हा तुटवडा थेट उत्पादनावर परिणाम करत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात असून, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली जाणार आहे.
केवळ मुंबईच नव्हे, तर बंगळुरूमध्येही फटका
गॅस टंचाईची ही झळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून दाक्षिणात्य शहरांमध्येही पोहोचली आहे. बंगळुरू हॉटेल असोसिएशनने गॅस अभावी मंगळवारपासून काही हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये एकापाठोपाठ एक हॉटेल्स बंद होऊ लागल्याने अन्न उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील मोठे उद्योग ठप्प
दुसरीकडे, पश्चिम आशियातील तणावामुळे कतारने नैसर्गिक वायूचे (LNG) उत्पादन थांबवले आहे. याचा थेट फटका महाराष्ट्रातील अवजड उद्योगांना बसला आहे.
- उत्पादन थांबले: छत्रपती संभाजीनगरमधील ५ मोठ्या कंपन्यांचे उत्पादन गॅसअभावी पूर्णपणे ठप्प झाले आहे.
- ऑटो आणि फार्मा क्षेत्राला फटका: शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा एमआयडीसीमधील ऑटोमोबाईल आणि औषध निर्मिती कंपन्यांना एलएनजी तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे.
- स्टील कंपन्या संकटात: स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे युनिट्सही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
एमआयडीसीला दररोज लागणाऱ्या २५० ते ३०० मेट्रिक टन गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हजारोंच्या रोजगारावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.









