Sameer wankhede : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना खळबळजनक दावा केला आहे. “मी अभिनेता शाहरुख खान याच्याशी कधीही कोणत्याही माध्यमाद्वारे संपर्क साधलेला नाही, त्यामुळे त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी खंडणी किंवा लाच मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे वानखेडे यांनी न्यायालयात स्पष्ट केले. २०२१ मधील गाजलेल्या ‘कॉर्डिलिया क्रूझ’ प्रकरणावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
२५ कोटींच्या लाचेचा आरोप आणि वानखेडेंचा बचाव-
सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की, आर्यन खानला या प्रकरणातून सुटका करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम पुढे १८ कोटींवर निश्चित झाली आणि त्यातील ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारल्याचाही दावा तपास यंत्रणेने केला आहे. मात्र, वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा यांनी सोमवारी न्यायालयात हे सर्व आरोप खोडून काढले. “वानखेडे यांनी स्वतः कधीही शाहरुख खानशी संवाद साधला नाही. जर त्यांच्या नावाचा गैरवापर करून इतर कोणी अशी कृत्ये केली असतील, तर त्यासाठी वानखेडे यांना जबाबदार धरता येणार नाही,” असा युक्तिवाद त्यांनी केला.
राजकीय सूडबुद्धी आणि तपासातील निष्पक्षता-
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे की, एनसीबीच्या पदावर असताना त्यांनी बॉलिवूड आणि अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. या कारवाईमुळे अनेक बड्या व्यक्तींची चौकशी झाली आणि काहींकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याच काळात सूडबुद्धीने आपल्याला खोट्या आरोपांत गोवण्यात आले, असे त्यांचे म्हणणे आहे. “मी सदैव प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपातीपणे तपास केला आहे. मात्र, एका विशिष्ट राजकीय व्यक्तीकडून मला सातत्याने लक्ष्य करण्यात आले असून माझ्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले,” असा दावाही त्यांनी यावेळी केला. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.










