Supreme Court News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपला तीव्र संताप व्यक्त केला. एका याचिकाकर्त्याच्या वडिलांनी सरन्यायाधीशांच्या भावाला फोन करून सुरू असलेल्या खटल्याबाबत विचारणा केली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या खंडपीठाने संबंधित व्यक्तीला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बौद्ध अल्पसंख्याक कोट्यांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दोन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुरू होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना विचारले की, “तुमच्या अशिलाच्या वडिलांविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करू नये? त्यांनी काय केले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का, की मी ते भरल्या न्यायालयात जाहीर करू?”
सरन्यायाधीशांचा कडक इशारा
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “त्यांची माझ्या भावाला फोन करण्याची हिंमतच कशी झाली? सरन्यायाधीशांनी हा आदेश कसा दिला, असे ते माझ्या भावाला विचारत आहेत. ते मला डिक्टेट करणार का? तुम्ही वकिलाने आधी स्वतःची खात्री करून घ्यावी आणि अशा अशिलाची केस सोडून द्यावी.”
ते पुढे म्हणाले, “जरी तो व्यक्ती भारताबाहेर लपून बसला असेल, तरी अशा लोकांशी कसे वागायचे हे मला चांगले ठाऊक आहे. मला धमकावण्याचा प्रयत्न कधीही करू नका. तुम्हाला वाटत असेल की मी केस ट्रान्सफर करेन, पण अशा घटकांशी मी गेल्या 23 वर्षांपासून डील करत आहे.” यावर संबंधित वकिलाने माफी मागत आपल्याला या प्रकाराची कल्पना नसल्याचे सांगितले.
अल्पसंख्याक कोट्यातील ‘फ्रॉड’वर ताशेरे
याआधी जानेवारी महिन्यात देखील न्यायालयाने या प्रकरणावर कडक टिप्पणी केली होती. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात अल्पसंख्याक कोट्याचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. न्यायालयाने याला “फसवणुकीचा नवा प्रकार” म्हटले होते. मूळ अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांचे हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.
याचिकाकर्त्यांनी आपण धर्मांतर केल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, मात्र न्यायालयाने या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुन्हा होणार आहे.










