Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. एका बाजूला अकोल्यासारख्या शहरांमध्ये पारा ४१.२ अंशांवर पोहोचला असतानाच, दुसरीकडे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे तसेच पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) यामुळे राज्याच्या अंतर्गत भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
- ३० मार्च: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता.
- ३१ मार्च आणि १ एप्रिल: संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- वादळी वारे: रविवारी सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा
पुढील चार दिवसांत कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून थोडी विश्रांती मिळेल. शनिवारी अकोल्यात ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पारा १-२ अंशांनी वधारला आहे.
मुंबईकरांना उन्हाचा तडाखा, पण तापमानात घट
मुंबईत शुक्रवारी सांताक्रूझ केंद्रात ३७.१ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र शनिवारी त्यात ५ अंशांची घट होऊन पारा ३२ अंशांपर्यंत खाली आला. तापमानात घट झाली असली तरी दमट हवेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण आहेत. मे महिन्यातील उष्णतेची चिंता आतापासूनच नागरिकांना सतावू लागली आहे. कुलाबा येथे ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस आणि गारपिटीच्या संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला असून, काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










