Dhurandhar Controversy: रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या यशाच्या आनंदात आता वादाची ठिणगी पडली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड प्रोडक्शन कंपनी ‘त्रिमूर्ती फिल्म्स’ने आदित्य धर यांच्या ‘B62 स्टुडिओ’ विरुद्ध कायदेशीर दावा ठोकला आहे. चित्रपटात ‘तिरछी टोपीवाले’ या गाण्याचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमका वाद काय आहे?
१९८९ मधील ‘त्रिदेव’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘तिरछी टोपीवाले’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. हे मूळ गाणे आनंद-मिलिंद यांनी संगीतबद्ध केले असून समीर अनजान यांनी लिहिले आहे. ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘रंग दे लाल’ या गाण्यात या जुन्या गाण्याचा काही भाग वापरण्यात आला आहे. हे नवीन गाणे शाश्वत सचदेव यांनी रिमिक्स केले आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सचा दावा आहे की, हे गाणे वापरण्यासाठी त्यांची कोणतीही परवानगी किंवा लायसन्स घेण्यात आलेले नाही. हा कॉपीराइट कायद्याचा भंग असून यामुळे मूळ मालकाच्या हक्कांवर गदा आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गाण्याचा वापर चित्रपटगृह, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि जाहिरातींमध्ये थांबवण्यासाठी मनाई हुकूम देण्याची मागणीही न्यायालयात करण्यात आली आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ आणि १००० कोटींचा आकडा
एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. भारतात या चित्रपटाने १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या ‘स्पाय ॲक्शन थ्रिलर’मध्ये जस्कीरत सिंग रंगी हा ‘हम्झा अली मजारी’ या गुप्तहेरात कसा रूपांतरित होतो, याची रंजक कथा दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटात रणवीर सिंगसोबतच संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात यामी गौतमची छोटी पण महत्त्वाची भूमिका आहे. एका गुप्तहेराची पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची ही थरारक कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे, मात्र आता या कायदेशीर पेचामुळे चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.










