PM Modi : संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. महिला सक्षमीकरणाच्या या विषयाला राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की, जर उद्देश प्रामाणिक नसेल आणि नीयतमध्ये खोट असेल, तर देशाची नारी शक्ती कधीही माफ करणार नाही. महिलांना त्यांचे हक्क देणे ही कोणाची मेहरबानी नसून, तो त्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
राजकीय श्रेयवादाला पूर्णविराम-
पंतप्रधानांनी विरोधकांच्या राजकीय स्वार्थाच्या आरोपांचा समाचार घेताना एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “आम्हाला या ऐतिहासिक निर्णयाचे कोणतेही वैयक्तिक श्रेय नको आहे. हे विधेयक सर्वसंमतीने मंजूर व्हावे, हीच आमची इच्छा आहे. मी तुम्हाला श्रेयाचा ‘ब्लँक चेक’ देण्यास तयार आहे. या विधेयकाच्या यशासाठी तुम्हाला ज्या कोणाचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे असेल, ते सरकारी खर्चाने छापून दिले जाईल. जर तुम्हाला माझी ‘हमी’ किंवा ‘वचन’ हवे असेल, तर मी तेही देण्यास कटिबद्ध आहे. मात्र, या पवित्र कार्याला राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नका.”
स्थानिक ते राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रवास-
आपल्या भाषणात मोदींनी पंचायत राजमधील आरक्षणाचा संदर्भ दिला. पूर्वी असे मानले जायचे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देणे सोपे असते, कारण तिथे कोणाचे मोठे पद धोक्यात नसते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागातील महिला आता केवळ नावापुरत्या नेत्या राहिल्या नसून, त्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. तळागाळातील या सक्षम महिला आता मुख्य प्रवाहात आपले स्थान मागत आहेत, हे राजकीय नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
भेदभावमुक्त आणि न्याय्य प्रक्रिया-
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही राज्यावर किंवा क्षेत्रावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. “आपण देशाला तुकड्यांमध्ये पाहू शकत नाही; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा एकच देश आहे. निर्णय घेताना कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केला जाणार नाही आणि आरक्षणाचे प्रमाण पूर्ववत संतुलित राखले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. अनेक दशकांपासून महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले आहे, ही चूक सुधारण्याची आणि त्याचे प्रायश्चित्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
डीएमके खासदारांच्या विरोधावर मिश्किल टिप्पणी-
विधेयकावर चर्चा सुरू असताना डीएमके (DMK) पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून विरोध दर्शवला होता. यावर पंतप्रधान मोदींनी भारतीय परंपरेचा संदर्भ देत मिश्किल टोला लगावला. ते म्हणाले, “आपल्या संस्कृतीत एखाद्या शुभ कार्याला कोणाची नजर लागू नये म्हणून ‘काळा टीका’ लावला जातो.











