Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपं पाहायला मिळत आहेत. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यावर सध्या चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील ३ दिवस पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
पावसाचे मुख्य कारण काय?
राज्यात सध्या ‘पश्चिमी विक्षोभ’ सक्रिय झाला आहे. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. यामुळे मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. यामुळे उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल, मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदा पाऊस कमी पडणार?
एकडे अवकाळीचा तडाखा बसत असतानाच, दुसरीकडे मान्सूनबाबत चिंतेची बातमी आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज हवामान संस्थांनी वर्तवला आहे. यामुळे यंदा देशात आणि राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती आणि वर्धा या भागात आजही उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम आहे.
मंगळवारी ‘यलो अलर्ट’ कुठे?
हवामान विभागाने राज्यातील खालील जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे:
विदर्भ: यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे आणि जळगाव.
मराठवाडा: छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली.










